सावंतवाडी : गणेशोत्सवात सावंतवाडी शहर तसेच तालुक्यातील गणेश भक्तांसाठी बाजाराची एकत्रित व्यवस्था व्हावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोती तलावाच्या काठावर बाजार भरविला जात होता. गणेशोत्सव कार्यकालात शहरातील तसेच शहराबाहेरील गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे कोरोना कालावधीपासून हा बाजार गेली तीन वर्षे मोती तलावाकाठीच भरविला जात आहे. गणेश भक्तांची गैरसोय टाळण्याकरीता तत्कालीन नगराध्यक्ष संजू परब यांनी याबाबतचा निर्णय घेतला होता.
या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील गणेशोत्सवाचा बाजार प्रतिवर्षाप्रमाणे मोती तलावाच्या काठावरच भरविण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा चिटणीस भारत उर्फ बंटी पुरोहित यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर साळुंखे यांना सादर केले आहे.