सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळप्रक्रिया उद्योगासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. तसेच सी-वर्ल्ड प्रकल्प झाला तर १० ते १५ पंचतारांकित हॉटेल होतील त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. सध्या जिल्ह्याच अडीच लाख रुपये दरडोई उत्पन्न आहे ते येत्या पाच वर्षांत ४ ते ५ लाख दरडोई उत्पन्न व्हावे म्हणुन प्रयत्न केला जाईल. त्यामुळे निश्चितच नागरिकांचे जीवनमान उंचावले असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. सावंतवाडी भटवाडी येथे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रदीप जोशी यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थितांशी बोलत होते.
यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, अबकी बार ४०० पार चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारा दिलाआहे त्यात कोकणातील खासदार असावा म्हणून मतदान करावे. आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पाठवावे. मी आतापर्यंत कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून तरूणांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले आहे. फळप्रक्रिया उद्योग,बाय प्राॅडक्ट बनावे म्हणून प्रशिक्षण केंद्र निर्माण होईल.
दरम्यान आंबोली चे रवींद्र ओगले यांनी कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न, वनसंज्ञा, आणि सावंतवाडी ते मुंबई अशी सकाळी रेल्वे धावली पाहिजे याकडे नारायण राणे यांचे लक्ष वेधले. कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न मी निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला तेव्हा काही वकीलांनी तक्रारी केल्या. त्यामुळे तो प्रश्न त्यावेळी निकाली लागला नाही. मात्र कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न, वनसंज्ञा व रेल्वे प्रवासी प्रश्नावर साकारात्मक प्रयत्न केला जाईल. यावेळी बाळ पुराणीक यांनी आजगाव येथील परशुराम मंदिर, वेदपाठशाळा बाबत माहिती दिली. तर प्रदीप जोशी यांनी स्वागत केले.
यावेळी केशव पित्रे, प्रमोद भागवत, संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर, दिपाली भालेकर, सुधीर आरिवडेकर, दिलीप भालेकर, वसंत परांजपे,आबा कशाळीकर,बाळु कशाळीकर, डॉ रश्मी जोशी,मोहीनी मडगावकर, मंजिरी धोपेश्वरकर, सौ साधले आदी उपस्थित होते.