आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा 19 हजार लाभार्थ्यांनी घेतला लाभ

Edited by: देवयानी वरसकर
Published on: October 18, 2023 18:28 PM
views 132  views

सिंधुदुर्गनगरी : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत 19 हजार 508 लाभार्थींना उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई रुपेश धुरी यांनी दिली.

केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह जिल्ह्यामध्ये २३ सप्टेंबर २०१८ पासून राबविली जात आहे. या योजनेमध्ये १२०९ गंभीर आजारावर ५ लक्ष रुपयापर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार अंगीकृत शासकिय व खाजगी रुग्णालयातून पूर्णतः मोफत केले जातात. हे आरोग्य विमा कवच प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लक्ष रुपये अशा स्वरुपात मिळत असते. या एकत्रीत योजनेमधून आतापर्यंत १९,५०८ लाभार्थ्यांना उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ मिळाला आहे.

कॅन्सर, हृदयरोगय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, जळीत स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्रशस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून), कृत्रिम अवयव, फुफ्फुस आजारावरील उपचार, एंडोक्राईन, इंटरव्हेशनल रेडीओलॉजी व होमॅटॉलॉजी इत्यादी सांधे प्रत्यारोपण (गुडघा, खुबा), लहान मुलांचा कर्करोग उपचार, मानसिक आजारांचा समावेश या योजनमध्ये करण्यात आला आहे.

लाभार्थी- जिल्ह्यामध्ये पीएमजेएवाय चे ३२५१७२ लाभार्थी व एमजेपीजेएवाय चे ३३६९२२ असे एकूण ६६२०९४ पात्र लाभार्थी आहेत. रुग्णालये राज्यात या योजनेमध्ये एकूण सुमारे १००० रुग्णालये अंगीकृत आहेत. त्यापैकी २२६ शासकिय रुग्णालये असून ७९८ खाजगी रुग्णालये अंगीकृत आहेत. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कणकवली, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी व लाईफटाईम हॉस्पीटल पडवे, डॉ. नागवेकर हॉस्पीटल कणकवली, संजीवनी हॉस्पीटल कणकवली, गुरुकृपा हॉस्पीटल कणकवली, सुयश हॉस्पीटल कुडाळ, संजीवनी बाल रुग्णालय सावंतवाडी, अंकुर हॉस्पीटल मालवण तसेच गोवा येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यायल बांबुळी या रुग्णालयाचा समावेश आहे.

१ सप्टेंबर २०२३ पासून आयुष्मान भव या मोहिमअंतर्गत आयुष्मान ३.० उपक्रम जिल्ह्याभरात राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सर्व पात्र लाभार्थीना त्यांचे आयुष्मान कार्ड शासनाकडून केवायसीद्वारे तयार करून दिले जात आहे.हे कार्ड तयार करण्याकरीता आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत केंद्रचालक, सेतू सुविधा केंद्र, आरोग्य यंत्रणा (सर्व शासकिय रुग्णालये) आणि अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र लाभार्थीच्या आधार कार्डाच्या सहाय्याने आयुष्मान कार्ड तयार करून देत आहे. या करिता राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण यांच्याकडून एक मोबाईल अॅप्लीकेशन तयार करण्यात आले आहे.

Web Portal: https://beneficiary.nha.gov.in Mobile Application: https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp  या लिंक करून अॅप डाऊनलोड करून लाभार्थी  बेनेफिशरी  (लाभार्थी) पर्याय निवडून स्वतःचे कार्ड स्वतः तयार करु शकतात. जिल्हा प्रशासनातर्फे या मोहिमेमध्ये सर्व ग्रामपंचायत सर्व आरोग्य केंद्र आणि शहरी भागात वार्डनिहाय कार्ड काढण्याची शिबिरे आयोजित केली आहेत. आतापर्यंत १,१९,७८२ पात्र लाभार्थीचे कार्ड तयार करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक असल्याने सर्व पात्र लाभार्थीनी आपले कार्ड त्वरीत काढून घेणे गरजेचे आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.