सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी तर व्यापारी संकुलासाठी पाच कोटी रुपयाचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला आहे अशी माहिती भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी दिली आहे .
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच सिंधुदुर्गनगरी प्राधिकारणची एक बैठक घेऊन सर्व प्रश्न जाणून घेत ते सोडविण्याच्या सक्त सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या व आवश्यक तेवढा निधी दिला जाईल. निधीची काळजी करू नका कामाला लागा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता पालकमंत्र्यांनी निधी मंजूर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे भाई सावंत यांनी सांगितले.
सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारलेला आहे. परंतु आजुबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण झालेले नाही. त्याठिकाणी नीट लाईटची व्यवस्थाही नाही, स्वच्छताही राखली जात नाही, हे सर्व प्रश्न लक्षात घेऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शिवाजी महाराजाच्या पुतळा परिसर आणि सिंधुदुर्गनगरी प्रवेश द्वाराला देखणे स्वरूप प्राप्त होणार आहे.
सिंधुदुर्गनगरी मध्ये दिवसेदिवस लोकवस्ती वाढत आहे. परंतु याठिकाणी सुसज्ज व्यापारी संकुल नाही लोकांना आजही मोठ्या खरेदीसाठो इतर शहरात जावे लागते. त्यामुळे इथे सुसज्ज व्यापारी संकुल होणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन व्यापारी संकुल उभारणीसाठी पाच कोटी रुपयाचा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला आहे. व्यापारी संकुल उभारणीसाठी प्राधिकरणने आराखडा सुद्धा तयार केलेला आहे अशी माहिती भाई सावंत यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वारा नजिकच मिनी मार्केट आहे. आठवडा बाजारही रविवारचा भरतो. मात्र त्याठिकाणी स्वच्छतागृह नाही ही समस्या लक्षात घेऊन प्रवेशद्वारा नजिक सध्या छोटेसे स्वछताग्रुह् तात्पुरते उभारून पावसाळा संपल्यावर मोठे सुलभ शौचालय उभारले जाणार आहे. त्यासाठीही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. सिंधुदुर्ग-ओरोस रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी मंजूर करून निविदाही काढलेलल्या आहेत. निविदा ओपन झाल्यावर रस्त्याचे काम आणि रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
तसेच सिंधुदुर्गनगरी मधील कचऱ्याचा प्रश्न सुद्धा मोठा आहे. तो सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी एका कंपनीला बोलविण्यात आले आहे. त्या कंपनीने कचरा उचलण्याची व घणकचरा व्यवस्थापनाची तयारी दाखवली कचऱ्याचाही प्रश्न सुटणार आहे. अंंतर्गत रस्ते पूर्ण खराब झालेले आहेत. त्याची दुरुस्ती व डांंबरीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे रस्त्याचाही प्रश्न सुटणार आहे अशी माहिती भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांनी दिली आहे.