IND vs SL 3rd T20: सुर्याच्या वादळापुढे लंका चारीमुंड्या चीत

नवीन वर्षात टीम इंडियाने नोंदवला पहिला मालिका विजय
Edited by: क्रीडा प्रतिनिधी
Published on: January 08, 2023 08:04 AM
views 304  views

राजकोट : तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताच्या फलंदाजांनी अफलातून फलंदाजी करत श्रीलंकेला २२९ धावांचे लक्ष्य दिलं. मात्र, टीम इंडियाच्या कमाल गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा संघ १३७ गारद झाला. त्यामुळे टीम इंडियाने तिसरा सामना जिंकल्यानंतर मालिकाही खिशात टाकली आहे.


भारत विरुद्ध श्रीलंकेमध्ये तीन टी-२० सामन्याचा मालिकेचा अंतिम सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडिअममध्ये रंगतदार अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर ९१ धावांनी विजय मिळवला. तिसऱ्या सामना जिंकून टीम इंडियाने २-१ ने मालिका जिंकली.


टीम इंडियाने २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाने १६.४ षटकात अवघ्या १३७ धावा केल्या. त्यामुळे टीम इंडिया ९१ धावांच्या मोठ्या फरकाने शेवटच्या सामन्यासहित मालिका जिंकली.


श्रीलंकेकडून दासून आणि मेंडिसने २३-२३ या सर्वाधिक धावा कुटल्या. त्याशिवाय डिसिल्वा आणि असानंकाने १९ धावा केल्या. तर पथूम केवळ १५ धावा करून माघारी परतला. तर टीम इंडियाच्या अर्शदीप सिंगने तीन गडी बाद केले. तर हार्दिक, उमरान आणि चहलने २-२ गडी बाद केले.


टीम इंडियासाठी सूर्यकुमार यादवने ११२ धावांची अफलातून खेळी खेळली. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात निराशजनक होती. ईशान किशान पहिल्याच षटकात स्वस्तात माघारी परतला. तर राहुल त्रिपाठीने ३५ धावा कुटल्यानंतर तंबूत परतला. त्यानंतर शुभमन गिल आणि सूर्यकुमारने टीम इंडियाचा डाव सावरला.


दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ५३ चेंडूमध्ये १११ धावा कुटल्या.गिल ४६ धावा करत बाद झाला. तर हार्दिक पंड्या आणि दीपक हुड्डा ४-४ धावा करत बाद झाले. अक्षर पटेलने ९ चेंडूमध्ये २१ धावा कुटल्या. सूर्यकुमारच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाने २० षटकात ५ गडी गमावून २२८ धावांचा डोंगर रचला.