दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात ग्रामविकासात सर्वोच्च योगदान देणाऱ्या झोळंबे ग्रामपंचायतला नुकतेच तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्काराने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गावच्या या सन्मानाबद्दल विविध स्तरातून कौतुक होत आहे.
गावच्या सरपंच विशाखा नाईक, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, विशाल तनपुरे, प्रभाकर सावंत, माजी आम. राजन तेली आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षात पंचायतराज क्षेत्रात गावाने ग्राम विकासात सातत्य राखले आहे. दरवर्षी ग्रामपंचायत विभागाच्या वतीने राज्यात स्मार्ट ग्राम योजना राबविले जाते. या योजनेत तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतला २० लाख रुपयाचे बक्षीस मिळते. या पुरस्काराला सांघिक कामाच्या जोरावर झोळंबे ग्रामपंचायतने गवसणी घातली. नुकतेच या पुरस्कारांचं जिल्हास्तरावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. झोळंबे गावाने दोडामार्ग तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीतून पहिला क्रमांक पटकावून पंचायतराज विकासात गावचे नाव उज्वल केल आहे. या याशाबद्दल गावचे सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनय गाडगीळ त्यांचे मार्गदर्शक गणेशप्रसाद गवस, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक नामदेव परब व ग्रामस्थांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.