
सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले कोंडुरा तळवणेमार्गे आरोंदा रस्त्याचे काम मंजूर होऊन तसेच वर्क ऑर्डर मिळून देखील गेले ४ महिने वेटिंगवरच आहे. बांधकाम विभागाकडून नेहमीच दोन दिवसात काम करण्याचे आश्वासन दिले जाते, मात्र, ठेकेदाराकडून याबाबत कोणतीही हालचाल दिसत नसल्याने अखेर हे काम पुढील दोन दिवसात सुरु न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा तळवणे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश कांबळी यांनी दिला आहे. तसेच याप्रश्नी पालकमंत्र्यांचे लक्ष देखील वेधणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे नादुरुस्त झाला असून यावर अनेक अपघात होत असतात. अपघातांची ही मालिका थांबविण्यासाठी सदरच्या रस्त्याचे काम त्वरित होणे आवश्यक असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे हे काम रखडले असल्याचा आरोप देखील सिद्धेश कांबळी यांनी केला असून दोन दिवसात या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.