सावंतवाडी : राज्य सरकारने अनेक जिल्ह्यात ४० अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाल्याने राज्य मंडळाच्या सर्व शाळांना वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दि. २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण व क्रीडा विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.परंतु वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंगणवाडीतील ३ ते ५ वयोगटातील मुलांना सुट्टी जाहीर करण्यात का आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. प्राथमिक शाळेतील मुलांच्या तुलनेत अंगणवाडीतील मुले लहान व नाजूक आहेत. ग्रामीण भागात ती मुले १५ ते २० मिनिटे चालत अंगणवाडीत येतात व पुन्हा तेवढेच अंतर चालत घरी जातात,वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर हे अवघड आहे. कृपया शासनाने वाढत्या उष्म्याचा विचार करून अंगणवाडीतील मुलांना सुट्टी जाहीर करून संवेदनशीलता दाखवावी अशी मागणी पालकांमधून होत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संजय पिळणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.