
कणकवली : असलदे गावात स्वतंत्र तलाठी कार्यालय व त्या सजेवर नव्याने तलाठी मिळावा , यासाठी सातत्याने पत्रकार भगवान लोके, सरपंच चंद्रकांत डामरे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळेच गावात स्वतंत्र तलाठी मिळू शकला. या गावातील धाकू मयेकर हे पुराच्या पाण्यात वाहून गेले त्यावेळी भगवान लोके यांनी घेतलेली भूमिका फार महत्वाची होती, त्यामुळेच एनडीआरएफ चे पथक आम्ही आणू शकलो. त्या शोधमोहिमेतून झालेल्या जनजागृतीमुळे काही दिवसांनी मृतदेह आढळून आला . गावाच्या प्रश्नांसाठी पोटतिडकीने प्रश्न मांडणारी माणसे असल्यानेच प्रश्न मार्गी लागत आहे. श्रीकृष्णाचे मंदीर उभारत एकात्मतेचे प्रतिक आहे. सामाजिक , धार्मिक सोहळ्यांमध्ये असलेली एकजूट गावाला विकासाकडे नेणारी असल्याचे प्रतिपादन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
असलदे गावठण ग्रामविकास मंडळ मुंबई व असलदे गावठण ग्रामविकास मंडळाच्यावतीने बळीराम (आबा) परब यांच्या मार्गदर्शनाखाली असलदे गावठण सत्यधाम सभागृह येथे श्रीकृष्ण मंदिराचा कलशारोहण व श्रीकृष्ण मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात ते बोलत होत. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , सरपंच चंद्रकांत डामरे , मंडल अधिकारी दिलीप पाटील, संतोष नागावकर उपसरपंच सचिन परब , बळीराम परब, माजी सरपंच सुरेश लोके , संचालक शत्रुघ्न डामरे , परशुराम परब, शामराव परब , आत्माराम घाडी , मंडळ अध्यक्ष संदीप शिंदे, दौलत परब, शंकर पाटील, बाबाजी शिंदे , संतोष घाडी , मारुती घाडी , अभय परब , दिनेश शिंदे , मधुसुदन परब , तुषार घाडी , संदीप घाडी , अक्षय परब , सुरेश परब, राजू पाटील , गणेश शिंदे , सत्यवान घाडी, कोतवाल मिलींद तांबे आदींसह गावातील ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसिलदार दीक्षांत देशपांडे व कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल , श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तसेच मंडल अधिकारी दिलीप पाटील , सरपंच चंद्रकांत डामरे यांनी मार्गदर्शन केले.
पत्रकार भगवान लोके म्हणाले , असलदे गावात ग्रामविकास मंडळाने एकजूट दाखवत श्रीकृष्णाचे मंदिर उभारले आहे. गेले 4 दिवस या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करत वातावरण प्रसन्न केले आहे. या कार्यक्रमासाठी तहसिलदार दीक्षांत देशपांडे व त्यांचे सहकारी उपस्थित राहिले , यातून त्यांना गावाबद्दल असलेली आपुलकी आणि प्रेम दिसून येत आहे. तहसिलदार यांनी गावचे तलाठी कार्यालय असेल किंवा विविध प्रश्न असतील त्या त्यावेळी त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला , त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.
असलदे गावठणवाडी येथे श्रीकृष्ण मूर्तीच्या प्रतिष्ठापणानिमित्त १२ मे ते १५ मे २०२५ या कालावधीत धार्मिक आणि सांस्कृतिक पार पडले. सोमवारी असलदे कोळंबा मंदिर ते रामेश्वर पावणाई मंदिर पासून सत्यधाम सभागृह श्रीकृष्ण मंदिर पर्यंत मुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.मंगळवारी श्रीकृष्ण देवता प्रतिष्ठापना, कलशारोहण, सकाळी श्रीगणेश पुजन,स्वस्तीपुण्याह वाचन, नवग्रह पुण्याहवाचन श्रीकृष्ण देवता जलाधिवास, देवता शय्या निवास,हवन व महाप्रसाद वाटप करण्यात आले.बुधवारी श्रीकृष्ण मुर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण तत्वन्यास,तत्वहोम पुर्णाहुती,आरती, महाप्रसाद व स्थानिक भजनांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.गुरुवारी सकाळी सत्यनारायण महापूजा,आरती, महाप्रसाद व सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता.रात्री स्थानिक स्थानिक भजन तर रात्री शक्तीतुरा कार्यक्रमाने तर कार्यक्रमांची रंगत अधिकच वाढली.शक्तीवाले शाहिर बुवा संतोष शिवगण, राजापूर व तुरेवाले शाहिर बुवा संतोष वेदुक राजापूर यांनी अप्रतिम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.