देवगड : देवगड तालुक्यात 'विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियानाला सुरुवात झाली असून देवगड येथील शिरगाव या गावात या संकल्प यात्रेचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. ही विकसित भारत संकल्प यात्रा देवगड तालुक्यातील एकूण ७२ गांवाना भेटी देणार असुन दरदिवशी दोन गावांना सकाळी व दुपारी या कालावधीत या अभियानांतर्गत कार्यक्रम होणार आहेत.
केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम मुद्रा लोन्स, स्टार्टअप इंडिया, पीएम आवास योजना, पीएम भारतीय जनऔषधी योजना, उज्वला योजना, आयुष्यमान भारत, स्वच्छ भारत मिशन, जल जिवन मिशन, मनरेगा आदी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडील डिजिटल स्क्रीन असलेली सुसज्ज व्हॅन उपलब्ध झाली आहे. शासनाच्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हे अभियान राबवले जाणार आहे. लाभार्थ्यांना या माध्यमातून विविध योजनांची प्रत्यक्ष माहिती दिली जाणार आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी, लाभार्थ्यांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड आप्पासाहेब गुजर यांनी केले आहे.
शिरगाव येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रेत शिरगांव गांव ओडीएफ+ झाल्याबद्दल सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या हस्ते शिरगांव सरपंच समिर शिरगांवकर यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपसरपंच संतोषकुमार फाटक, समाजसेवक संदीप साटम, कृषि अधिकारी दिगंबर खराडे, विस्तार अधिकारी ग्रा.प अंकुश जंगले, सर्कल मंडळ अधिकारी आर. ए . निग्रे, तलाठी एस.के. खरात, ग्रा.प सदस्य राजेंद्र शेटये, विस्तार अधिकारी आरोग्य प्रतिमा वळंजु, विस्तार अधिकारी अडुळकर, मुख्यसेविका पुजा सावंत, ग्रामविकास अधिकारी रामदास हडपिडकर, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर, ग्रामविकास अधिकारी डी .एस. चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, आशा, बचतगट प्रतिनिधी ,लाभार्थी, ग्रामस्थ व विदयार्थी उपस्थित होते.