
वैभववाडी : सोनाळी येथील कै. विलास भास्कर रावराणे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले.वैभववाडीचे माजी सभापती अरविंद रावराणे यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनाने रावराणे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
कै. विलास रावराणे यांनी मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तब्बल ३५ वर्षे सेवा बजावली होती.सेवाकाळात त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास हातभार लावला, तसेच गरजू रुग्णांना आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या सामाजिक जाणिवेमुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे ते सर्वसामान्यांचे आधारवड म्हणून ओळखले जात होते.
काही दिवसांपासून मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मुंबई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.










