
वैभववाडी : विद्यार्थीदशेत १० वी व १२वी हा शिक्षणाचा महत्वाचा टप्पा आहे.हा टप्पा यशस्वीपणे पार केला तर पुढील मार्ग सुकर होतो.या टप्प्यानंतर विद्यार्थ्यांनी योग्य ते क्षेत्र निवडून आपलं उज्वल भविष्य घडवावे असं आवाहन ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले. शिवसेना-युवासेनेच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील इयत्ता १० वी १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानसभाप्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपजिल्हाप्रमुख संदीप कदम,उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, दिव्या पाचकुडे, नगरसेवक मनोज सावंत, जावेद शेख, गुलझार काझी, सरपंच जितेंद्र तळेकर, रवींद्र रावराणे, विशाल जाधव आदी उपस्थित होते.
पारकर म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्हा हा गेली कित्येक वर्षे १० वी १२ वी निकालात अव्वल टक्केवारी मिळवण्याचा विक्रम करीत आहे. येथील विद्यार्थ्यांमध्ये तेवढी बुद्धीमत्ता आहे.हे यश असंच टिकलं पाहीजे.शिक्षणाच्या या टप्प्यानंतर योग्य तो मार्ग निवडून आपले आयुष्य उज्ज्वल कराव असं आवाहन श्री पारकर यांनी केलं. १० वी १२ वी नंतर कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांनमधून मुलांनी कोणती शाखा निवडावी याबाबत मार्गदर्शन सतिश सावंत यांनी केले. कॉलेज व्यतिरिक्त विद्यार्थ्यानी व्यावसायिक शिक्षणाकडेही वळले पाहिजे.यातूनही चांगली उन्नती साधता येते असं सावंत यांनी सांगितले.
सुशांत नाईक म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.विद्यार्थानी असंच यश संपादन करावे.आम्ही आपल्या सोबत सदैव राहू असं आश्वासन दिले.यावेळी संदीप कदम, नीलम पालव यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सर्व विद्यार्थांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.