
कुडाळ : माझा पराभव हा लढाई करून झाला आहे. पराभव स्वीकारला असून कोणतीही कारणे द्यायची नाहीत आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला सुरुवात करायची आहे असे प्रतिपादन कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी केले . यावेळी बोलताना नाईक भावुक झाले.
कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाठ, तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, तालुका संघटक बबन बोभाटे, महीला आघाडी तालुका प्रमुख स्नेहा दळवी, मथुरा राऊळ योगेश धुरी , कुडाळ महीला शहर प्रमुख मेघा सुकी तसेच ठाकरे सेनेचे कुडाळ तालुक्यातील पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, शिवसेना सेलचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी सोमवारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की पण सर्वांनी लढाई केली आणि पराभव झाला आहे मी पराभवाची कारणे शोधत बसलो नाही पराभव स्वीकारला आहे. माझ्यासाठी संघर्ष नवीन नाही, संघर्ष नेहमीच करत आलो असून आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला सर्वांना सुरुवात करायची आहे.
या मतदारसंघाने दोन वेळा आमदार केलं आताही 72 हजार लोकांनी मतदान केलं असून या सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार आहे सर्वांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू. जे शेवटपर्यंत राहतील त्यांच्यासाठी काम करत राहणार.
आता मी आमदार नाही. त्यामुळे मला कोणीही आमदार म्हणून हाक मारू नका. वैभव नाईक या नावाने हाक मारली तरी चालेल कारण पद होते ही येतात जातात व जे ही कायमस्वरूपी नसतात आणि मी आमदारकी मिरवायची म्हणून कधीही मिरवली नाही.
दुसऱ्या पक्षात घेण्यासाठी मला अनेक प्रलोभने दाखवण्यात आली परंतु आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाशी ठाम राहिलो पक्षाशी ठाम राहिलो हललो नाही. आम्ही निवडणुकी विचारावर आम्ही निवडणूक लढवली मात्र विरोधकांनी वेगवेगळे मुद्दे आणले. जे निवडून आले त्यांना मी या अगोदरच शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी चांगलं काम करावं असं त्यांनी सांगत जनतेच्या प्रश्न समस्या सोडवण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरू असेही सांगितले. पक्ष संघटना वाढीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की जे पदाधिकारी काम करीत नाही आहेत त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी नेमण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी सांगितले की, मतभेद बाजुला ठेऊन एकसंध रहा, सर्व कामे शिवसेनेच्या माध्यमातून झाली, सर्व गावागावात नाईक पोहचले, आपली ताकद तशीच ठेवा यापुढे यश आपलेच आहे.. नागेद्र परब यानी सांगितले की सर्वांच्या मनातील आमदार वैभव नाईक आहेत ते आमचे आमदारच राहतील पुन्हा एकदा आपल्याला थांबून चालणार नाही तर वेळप्रसंगी अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरणे सुद्धा गरजेचे आहे असे सांगितले.
वैभव नाईक झाले भावूक
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही पहिली सभा पदाधिकाऱ्यांची होती यावेळी भाषणाच्या शेवटी शेवटी वैभव नाईक हे खूप भावुक झाले व त्यांनी याही पुढे सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहणार असे सांगतानाच त्यांचा कंठ दाटून आला व बैठकीतील वातावरण ही काहीसे शांत झाले. त्यानंतर वैभव नाईक यांनी भाषण थांबवून व्यासपीठावरून खाली येत उपस्थित कार्यकर्त्यांशी भेटून संवाद साधला यावेळी प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी संजय पडते यांनी सांगितले की, मतभेद बाजुला ठेऊन एकसंध रहा, सर्व कामे शिवसेनेच्या माध्यमातून झाली, सर्व गावागावात नाईक पोहचले, आपली ताकद तशीच ठेवा यापुढे यश आपलेच आहे.