चौकुळ गावात अभिमान, अश्रू आणि देशभक्तीचा संगम

शहीद रामचंद्र गावडे स्मारकाचे अनावरण
Edited by: विनायक गांवस
Published on: April 03, 2026 18:46 PM
views 567  views

सावंतवाडी : श्रीलंकेतील ऑपरेशन पवन मोहिमेदरम्यान भारतीय सैन्यदलात कार्यरत असताना शहीद झालेल्या रामचंद्र सोमा गावडे यांना ३ एप्रिल १९८८ रोजी वीरमरण आले होते. त्यांच्या या महान बलिदानानंतर तब्बल ३८ वर्षांनी त्यांच्या कुटुंबीयांनी चौकुळ -केगदवाडी येथे त्यांच्या स्मारकाची उभारणी केली. या स्मारकाचे अनावरण ३ एप्रिल रोजी करण्यात आले.

या सोहळ्यास माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, तहसिलदार श्रीधर पाटील, कॅप्टन मार्टिन, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य शोभा गावडे, सरपंच गुलाबराव गावडे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, अंबोली सरपंच सावित्री पालेकर, दिनेश गावडे, माजी सैनिक बापू गावडे, सुभाष गावडे, प्रमुख गावकर बाळाभाई गावडे, निसर्ग अभ्यासक काका भिसे तसेच पंचक्रोशीतील नागरिक आणि बेळगाव, कोल्हापूर आदी ठिकाणांहून आलेले वायू मराठा बटालियनचे आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते शहीद रामचंद्र सोमा गावडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच शौर्याचे प्रतीक असलेल्या बंदुकीचेही अनावरण करण्यात आले.  भारत गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत शहीद गावडे यांच्या शौर्यगाथेचे वाचन केले. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीत व वीरगीतांनी वातावरण देशभक्तीने भारावून गेले. कार्यक्रमादरम्यान ऑपरेशन पवनमध्ये सहभागी झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या काळातील हृदयद्रावक प्रसंग उलगडला. त्यांनी सांगितले की, एका छोट्या पुलाखाली लपवून ठेवलेल्या ग्रेनेड बॉम्बचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात गाडी अक्षरशः हवेत उडाली आणि या दुर्दैवी घटनेत शहीद रामचंद्र सोमा गावडे यांना वीरमरण आले. हा प्रसंग ऐकताना उपस्थित नागरिक अक्षरशः स्तब्ध झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वीरफुलांचे चक्र अर्पण करून शहीद रामचंद्र सोमा गावडे यांना आदरांजली वाहण्यात आली. सर्व उपस्थितांनी स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी शहीदांच्या कुटुंबीय पत्नी श्रीमती सीता गावडे, मुलगी शिल्पा गावडे, सून समीक्षा गावडे, मुलगा सुनील गावडे आणि मुलगी शीतल गावडे यांना अश्रू अनावर झाले. शहीद रामचंद्र सोमा गावडे हे जेव्हा वीरमरण पावले त्यावेळी त्यांची मुले अतिशय लहान होती. त्यामुळे वडील कसे होते ? त्यांचे कार्य काय होते ? याची त्यांना प्रत्यक्ष आठवण नव्हती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वडिलांविषयी ऐकताना त्यांच्या भावना अनावर झाल्या. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. हे हृदयस्पर्शी दृश्य पाहून उपस्थित नागरिकही भावूक झाले.

आपल्या भाषणात आमदार दीपक केसरकर यांनी चौकुळ हे सैनिकांचे गाव असल्याचे सांगत येथील सैन्य परंपरा अत्यंत प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. प्रतिकूल परिस्थितीतही गावातील युवकांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा केली असून ही परंपरा पुढेही कायम राहावी. इतर गावांनीही या परंपरेतून प्रेरणा घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनीही चौकुळचा सैन्य परंपरेबद्दल अभिमान व्यक्त केला. कॅप्टन मार्टिन यांनी फायू मराठा बटालियनच्या विविध मोहिमा आणि त्यातील वीर जवानांच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना संबोधित केले. स्थानिक ग्रामस्थ तसेच आजी-माजी सैनिकांनी शहीद स्मारक अनावरणाचा हा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. चौकुळ गावात अशा प्रकारचा सोहळा प्रथमच आयोजित करण्यात आल्याने आजी-माजी सैनिकांमध्ये विशेष उत्साह आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमास चौकुळ परिसरातील ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, आणि भावनिक वातावरणात पार पडला. शहीद रामचंद्र सोमा गावडे यांच्या स्मारक अनावरणाने गावात देशभक्ती, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना पुन्हा एकदा जागृत झाली.