उद्धव ठाकरेंचं कोकणी माणसावर बेगडी प्रेम

दीपक केसरकरांनी घेतला खरपूस समाचार
Edited by: विनायक गांवस
Published on: April 10, 2025 12:57 PM
views 166  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री असताना कोकणच्या भल्याचा एकही निर्णय न घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे कोकणी माणसावर बेगडी प्रेम आहे अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी खरपूस समाचार घेतला केली. कोकणी माणसावर बेगडी प्रेम दाखवून कोणी त्याचा वापर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यासाठी करत असेल तर ते चुकीचं आहे असं मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.

नुकताच उबाठा नेतृत्वाने पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करण्याचे जाहीर केले. या वक्तव्याचा केसरकर यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, कोकणातील शेतकऱ्यांसाठी काजू बोर्डाच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने समिती नेमली होती. तेव्हा अर्थराज्यमंत्री या नात्याने या समितीचे आपण अध्यक्ष होतो. काजूचे धोरण कोकणचा कायापालट करणारे धोरण होते, मात्र अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीही त्या धोरणाला मंजुरी दिली नाही. यावरुन उद्धव ठाकरेंना दुर्लक्षित कोकणाबद्दल किती आत्मियता होती हे जवळून अनुभवले, असा टोला केसरकर यांनी लगावला. चांदा ते बांदा योजना अर्थ खात्याने बंद केली होती. ती पुन्हा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश आवश्यक होते. मात्र तेव्हाही उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले. कोकणाच्या विकासासाठी एक शब्द देखील टाकला नाही ही वस्तुस्थिती आहे. काजू बोर्डाच्या संदर्भातील समितीचा मी अध्यक्ष होतो. त्या समितीचं काजू धोरण संपूर्ण कोकणाचा कायापालट करणारं धोरण होतं. पण मविआ सरकारला अडीच वर्षात कधी त्याला मंजुरी द्यावी असे वाटले नाही असं मत व्यक्त केले.

कोकणी माणसावर त्यांचे केवळ बेगडी प्रेम आहे, त्याचा केवळ शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यासाठी वापर केला जातो, जे चुकीचे आहे, असे केसरकर म्हणाले. याउलट एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर लगेच काजू बोर्डाला १५०० कोटींचा निधी दिला, असे केसरकर म्हणाले. काजू उत्पादक शेतकऱ्याना सरकारने पहिल्यांदाच आर्थिक मदत केली काजू बोंडाशी संबधित उद्योगांबाबतचा प्रयोग यशस्वी झाल्यास कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना ३००० कोटींचा फायदा होईल. हे पूर्वी का घडले नाही, असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला त्यामुळेच संपूर्ण कोकण किनारपट्टी ही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वासोबत राहिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून कोकणी जनता मूळ शिवसेनेसोबतच असल्याचे शिक्कामोर्तब झाले.

कोकणात जे प्रकल्प आले त्याला विरोध करण्यात उबाठा आघाडीवर होती. राजकारण करत त्यांनी विरोधाला विरोध केला. मात्र यातून कोकणी तरुणांचे रोजगार बुडाले. कोकण विकासापासून वंचित राहिले, अशी टीका केसरकर यांनी केली. त्यामुळे कोकणी जनता तुम्हाला कधीच सोबत करणार नाही, असे केसरकर म्हणाले.