...तर मी पुन्हा मुख्यमंत्री होईल : लक्ष्मीकांत पार्सेकर

'ज्ञानदीप'चे पुरस्कार प्रदान ; गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती
Edited by: विनायक गावस
Published on: November 05, 2023 18:13 PM
views 82  views

सावंतवाडी : तब्बल सतरा वर्ष अविरत आदर्श व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या ज्ञानदीप मंडळाचा आदर्श सामाजिक संस्थांनी घ्यावा असे प्रेरणादायी कार्य ज्ञानदीपचे आहे. पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये सर्वाधिक शिक्षक आहेत. ज्ञानदीप मंडळाच्या या अभिनव उपक्रमात माझ्यासारख्या एका शिक्षकाकडून सेवाव्रत्ती शिक्षकांचा गौरव झाला त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो असे गौरवोद्गार गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सावंतवाडीत काढले. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या जिल्हास्तरीय ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, गोवा आणि सिंधुदुर्ग यांचं रोटी-बेटीचं नातं आहे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जावई आहे. माझा उल्लेख सातत्याने माजी मुख्यमंत्री असा होत आहे. पण, मी त्या आदी ४० वर्ष शिक्षक होतो आजही आहे‌. सारखा माजी मुख्यमंत्री असा उल्लेख होत असल्यानं मी पुन्हा मुख्यमंत्री होईल पण त्यासाठी माझा शिक्षक म्हणून उल्लेख व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

सावंतवाडी येथे ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उद्घाटक म्हणून गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी सौ.सीमा पंडित (सावंतवाडी), प्रा.संतोष जोईल (फोंडाघाट), पांडुरंग दळवी (वजराट ता . वेंगुर्ले) , निलेश मोरजकर (बांदा), प्रकाश कानूरकर (कट्टा -मालवण), उत्तम फोंडेकर (कुंभारमाठ ता. मालवण) या उपक्रमशील व्यक्तिंना ज्ञानदीप शैक्षणिक मंडळातर्फे सन्मान चिन्ह शाल, श्रीफळ, गौरवपत्र, देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर मुख्याध्यापक प्रदीप सावंत यांचा शालेय पदविका अभ्यासक्रमात कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै केंद्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर यांचा विशेष योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक म्हणाले, ज्ञानदीप म्हणजे समाजातील चांगुलपणा आणि निरपेक्ष झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना शोधणारा एक संस्कारी परिवार आहे. ज्ञानदीप मंडळाच्या प्रत्येक शिलेदारांना राज्यस्तरावर गौरविले जाते याचा अभिमान ज्ञानदीपला आहे. 17 वर्षाच्या प्रवासात अनेक अडथळे अनेक वादळे पेलून ज्ञानदीप घट्टपणे उभा राहिला यामागे ज्ञानदीपच्या परिवाराचा फार मोठे संघर्ष आहे. आपल्या कार्यक्रमात अनेकांना गौरविले जाते याचा सार्थ अभिमान ज्ञानदीपला नेहमीच आहे आणि तो राहील अशी भावना श्री. नाईक यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख अतिथी असणाऱ्या कोकण महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे म्हणाल्या, ज्ञानदीप मंडळाने आयोजित केलेला कार्यक्रम हा एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. समाजाच्या सर्व स्तरावर काम करणाऱ्या गुणवंतांचा ज्ञानदीप सन्मान करते आणि आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अशा लोकांची ओळख करून देते, हे फार मोठे कार्य ज्ञानदीप करीत आहे. १७ वर्ष अविरत असं कार्य ज्ञानदीप करत आहे. या संस्थेत अधिक शिक्षक आहेत. शिक्षक हे समाज घडवत असतात. तर या समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्यांचा सन्मान ज्ञानदीप मंडळ करत आहे. असे सांगत त्यांनी ज्ञानदीपला शुभेच्छा देऊन कौतुकही केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. ॲड. अरुण पणदूरकर म्हणाले, ज्ञानदीप हा सतत तेवणारा असतो. त्याचप्रमाणे ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे कार्य सुरू आहे. नव्या पिढीवर संस्कार करायला शिक्षक म्हणून आपण कुठं चुकतोय का? याचा विचार करायची वेळ आली आहे, असे प्रकार समाजात घडत आहेत. या समाजाला सुधारण्यासाठी शिक्षकांनं प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे - परब, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ॲड. अरुण पणदूरकर, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व युवा उद्योजक शैलेश पै, सैनिक पतसंस्थेचे माजी चेअरमन शिवराम जोशी, कळसुलकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठस्कर, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक. अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कार्याध्यक्ष निलेश पारकर, खजिनदार एस. आर. मांगले, सहसचिव विनायक गांवस, माजी मुख्याध्यापक व्ही. टी. देवण, कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, मळगाव हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत, नवीन शैक्षणिक धोरणाचे राज्य सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे, एस. जी. साळगावकर, प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, प्रा.सुरेश म्हसकर, उद्योजक व कवी दीपक पटेकर, कवी विठ्ठल कदम, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी पांडुरंग काकतकर, सोनुर्ली हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक प्रदीप सावंत, आदर्श शिक्षक दत्ताराम सावंत, सेवानिवृत्त शिक्षक शंकर प्रभू, वैभव केंकरे, श्रद्धा सावंत, अनिल ठाकूर, एस. पी. कुळकर्णी, एस. व्ही.भुरे, सुनील नेवगी अनिल कांबळे, कला शिक्षक हंसराज गवळी, रमेश काकतकर(बेळगाव) गौरी डिचोलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी केले तर आभार  सहसचिव विनायक गांवस यांनी मानले.