कुडाळ : माणगाव धरणवाडी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीचा निषेध करून घंटानाद आंदोलनाला सुरूवात झाली आहे. "बेजबाबदार ग्रामपंचायत प्रशासनाचा, सरपंचाच्या कर्तव्याचा बेजबाबदारपणांचा निषेध असो !" अशा घोषणांनी माणगाव परिसर दणाणून गेला आहे. माणगाव धरणवाडी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक कानेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत समोर घंटानात आंदोलनला सुरुवात झाली.
"बेजबाबदार ग्रामपंचायत प्रशासनाचा, सरपंचाच्या कर्तृत्वाच्या बेजबाबदारपणाचा निषेध असो!'' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलेला आहे. मात्र या आंदोलनाकडे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष राहून राहिले आहे. धरणवाडी ग्रामस्थ या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
धरणवाडी ग्रामस्थांच्या आंदोलन ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रणजीत देसाई दाखल झाले आहेत. यावेळी भाजपचे कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, पप्या तवटे, रूपेश कानडे यांनीही उपस्थिती लावत घंटानाद आंदोलनाला पाठिंबा दिला.
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रणजीत देसाई यांनी माणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी वैभव सावंत यांना धारेवर धरले. ग्रामपंचायतीचा निधी धरणवाडी रस्त्यावर खर्ची पडला असूनही तो रस्ता कसा अडवला जातो? २३ नंबरला रस्ता लागलेला असून तो ग्रामपंचायतीच्या मालकिचा असूनही ग्रामपंचायत गप्प का? रणजीत देसाई यांनी सवाल उपस्थित केला. रस्ता अस्तित्वात असेल तर तो रोखून धरण्यात येतो, मग ग्रामपंचायत प्रशासन करतय काय? तुम्ही तुमच्या मालमत्तेचे संरक्षण करू शकत नाही, तर उपयोग काय? अशा प्रश्नांचा भडीमार करत रणजित देसाई यांनी ग्रामविकास अधिकारी वैभव सावंत आणि पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकरी संजय आरोसकर यांना धारेवर धरले. रणजित देसाई यांनी जोरदार बॅटींग केली. उपस्थित अधिकारी वर्ग यावेळी निरुत्तर झाले.