
सावंतवाडी : रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ९ वर्षांपूर्वी टर्मिनसचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, त्यानंतर टर्मिनस दर्जाचा विकास साधण्यात आला नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारासह रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा 'घंटानाद' होणार आहे. टर्मिनसच भिजत घोंगडे, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा काढून घेतलेला थांबा पूर्ववत करणे, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे, रेल्वेत पाणी भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून २६ जानेवारी रोजी भव्य आंदोलन छेडण्यात आले होते. दरम्यान, येत्या १५ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करून कोकण रेल्वे, मंत्री, लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधले जाईल असे सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर यांनी सांगितले.
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनसचे भूमिपूजन झाले. मात्र बाह्य सुशोभीकरण लोकार्पण करण्यात आले तेव्हा सावंतवाडी रोड असा फलक लावण्यात आला. याकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले आहे असे सचिव मिहीर मठकर यांनी म्हटले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ झाला होता. सावंतवाडी रोड टर्मिनस म्हणून भूमिपूजन होवूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने 'सावंतवाडी रोड' असा फलक लावला आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचंही याकडे लक्ष वेधले असून त्वरीत कार्यवाहीची अपेक्षा सावंतवाडीकरांना आहे. सद्यस्थितीत मात्र, या रेल्वे स्थानकाला तत्कालीन युती सरकारच्या म्हणण्यानुसार 'सावंतवाडी रेल्वे टर्मिनस' म्हणावे ? की आताच्या महायुती सरकारच्या काळात लागलेल्या पाटीनुसार 'सावंतवाडी रोड' ? म्हणावे याबाबत प्रवासी वर्गात संभ्रमावस्था आहे.