अधिकाऱ्यांनी टाकलं वाळीत | दुरुस्ती होत नाही तोपर्यंत शाळा बंद

उपवडे ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा | गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिलं निवेदन
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 25, 2022 19:32 PM
views 193  views

कुडाळ : शाळेच्या दुरावस्थेबाबत 5 वर्षे पाठपुरावा करून देखील अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आता उपवडे ग्रामस्थ्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. यासंदर्भात शासनाला त्यांनी सविस्तर निवेदनही दिले आहे.

निवेदनातील माहितीनुसार, अतिशय दुर्गम, डोंगरकपारीत, सह्याद्रीच्या कुशीत आणि जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या उपवडे गावाला शासनकडून नेहमीच सावत्रपणाची वागणूक मिळाली. इतर सोयी सुविधा यांच्या बाबतीत सोडा पण किमान शैक्षणिक सुविधापासून गावाला वंचित ठेवू नका. गावातील प्राथमिक शाळेच्या इमारतीची अतिशय खराब अवस्था आहे आणि लोकांनी गेली 5 वर्ष याचा पाठपुरावा शासनस्तरावर करून सुद्धा प्रशासन ढिम्म आहे.

गेल्या जुलै महिन्यात शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळला, जीवितहानी होता होता वाचली, त्याचा सविस्तर रिपोर्ट देऊन सुद्धा कोणताही जबाबदार अधिकारी पाहणीसाठी सुद्धा आला नाही. तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस स्टेशन यांना आता ग्रामस्थानी निर्वाणीचा इशारा दिलाय, जोपर्यंत शाळेची इमारत दुरुस्त होत नाही तोपर्यंत शाळेत एकही मुलं शाळेत जाणार नाही. आपला देश जागतिक महासत्ता होत असताना एखाद्या गावात अशी वेळ येत असेल आणि ते ही शिक्षणविषयीं  तर हे लाजिरवाण आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.