LIVE UPDATES

कोकम पीक वाया ; नुकसान भरपाई द्या

ठाकरे शिवसेनेने वेधलं लक्ष
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 04, 2025 22:29 PM
views 118  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकम पिकासह विविध फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकम पीक 100% वाया गेले आहे. तरी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आज ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह राजन तेली, परशुराम उपरकर, सतीश सावंत, अमरसेन सावंत सुशांत नाईक आधी पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेत शेतकऱ्यांना भेडसावत असणाऱ्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधले. यामध्ये त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 मे पासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक घरे गोठे जमीनदोस झाली आहेत. तर कोकम पिकासह जांभूळ फणस व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कोकम पिक शंभर टक्के वाया गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. कोकम पीक हे एकत्रित क्षेत्रात नसल्याने कोकम पिकाच्या नुकसानीसाठी झाडांची संख्या मोजून पंचनामे करावेत हे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत. त्यासाठी आपण तात्काळ सूचना द्याव्यात तसेच पावसामुळे शेतीचे बांध वाहून गेले आहेत त्यांची ही नुकसान भरपाई मिळावी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक रस्त्यांची कामे ठेकेदारांनी अर्धवट ठेवले आहेत. त्यामुळे अनेक रस्ते चिखलमय असे झाले आहेत. वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. ज्या ठेकेदाराने रस्त्यांची कामे अर्धवट ठेवली आहेत अशा ठेकेदारांवर काळ्याआधी टाकण्याची कारवाई करावी इत्यादी मागण्या यावेळी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केले आहेत. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू आहे. बोगस कर्मचारी दाखवून आर्थिक अपहार केला जात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या संख्येने दाखवून प्रत्यक्षात कमी कर्मचारी कार्यरत आहेत. याबाबत आपण लक्ष द्यावे अशी सूचना यावेळी करण्यात आली. तर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधून ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीबाबत याबाबत माहिती घेऊन आपण कधीही अचानक वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर सर्व कर्मचारी दिसून आले नसतील तर संबंधितांवर कारवाई केली जाईल त्यामुळे चुकीचा कारभार सुरू असेल तर तात्काळ थांबवा असे आदेश यावेळी अधिष्ठाता यांना दिले.