मोरगाव ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन

लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचा माघार
Edited by:
Published on: April 01, 2026 19:59 PM
views 40  views

दोडामार्ग :  मोरगाव दलित वस्तीत सौर पथदिवे दिवे बसविण्यास ग्रामपंचायत आणि ठेकेदार हलगर्जी पणा करत असल्याचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांच्या कडे लेखी निवेदन देऊनही या प्रकरणी जातीनिशी लक्ष न दिल्याने  संतप्त ग्रामस्थानी सोमवारी मोरगाव ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना धारेवर धरले, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी याठीकाणी येवून आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दयावे. अशी आग्रही आणि आंदोलनात्मक भूमिका घेत ठिय्या आंदोलन केले. अखेर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदार यांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर ग्रामस्थानी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना तसेच जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून मोरगाव दलित वस्तीसाठी १५ सौर पथदिव्यांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, सरपंच संतोष आईर यांनी ठेकेदार यांना दलित वस्ती वगळून गावठाण व बागवाडी येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत बसविनयाचे आदेश दिले. या प्रकाराला विरोध करत ग्रामस्थांनी काम थांबवले. त्यानंतर गटविकास अधिकारी यांच्याकडून चौकशी केली जाईल, असे आश्वासन सरपंचांनी दिले होते.मात्र दोन महिने उलटूनही पुढील काम न झाल्याने मोरगाव ग्रामस्थानी दोडामार्ग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर बाब निदर्शनास आणून दिली असता या बाबत आपण सखोल चौकशी करून संबंधितवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. लेखी आश्वासन देऊनही गटाविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने संतप्त ग्रामस्थानी सोमवारी सकाळी १०. ३० वाजता मोरगाव ग्रामपंचायत कार्यालयात मधुकर ध. कदम, बाळकृष्ण रू. कदम, गोविंद ल. कदम, पांडुरंग म. कदम, उत्तम ल. कदम, प्रमोद श. पालयेकर, कृष्णा च. कदम, किशोर कदम, सुवर्णा नेरुरकर, सुहासिनी कदम सह असंख्य महिला व पुरुष ठिय्या आंदोलन केले. 

यावेळी सरपंच  संतोष वसंत आईर, उप सरपंच देविदास महादेव पिरणकर, ग्रामसेवक यशवंत देविदास कुबल, सदस्य सत्यवान नाईक, संघमित्रा म. कदम, खुशी भु. कदम उवस्थित होते.

गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन दहा दिवस उलटून गेले त्यांच्या कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. सरपंच यांनी ही आश्वासन दिले होते मात्र त्यांनीही कोणत्याही प्रकारची पुढील कार्यवाही केली नसल्याने उपस्थित ग्रामस्थानी संताप व्यक्त करत संबंधित अधिकारी यांच्या कडून आम्हाला लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथीन हलणार नाही अशी आक्रमक आणि आंदोलनात्मक भूमिका घेत ठिय्या आंदोलन सुरु केले.

दरम्यान गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांच्या भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता आपण कामा निमित्त बाहेर आहे या प्रकरणी आपण दोन दिवसात निर्णय देतो असे सांगितले असता, गटविकास अधिकारी येत नसतील संबंधित ठेकेदार यांना बोलवा जोपर्यंत संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार यांनी ठीकाणी येऊन आम्हाला लेखी पत्र दयावे अन्यथा आम्ही ग्रामपंचायत कार्याल्याच्या बाहेर जाणार नाही अशी ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरूच ठेवले. 

दरम्यान सरपंच यांनी संबंधित ठेकेदार सचिन देसाई यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेतले त्यानंतर ग्रामस्थाशी चर्चा केली दिनांक १० एप्रिल पूर्वी दलित वस्तीतील सर्व सौर पथदिवे बसवून देवू असे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी लेखी पत्र दिल्या नंतर पाच तासानी म्हणजे ३. ३० वाजता हे ठिय्या आंदोलन ग्रामस्थानी मागे घेतले.