कणकवली : महाराष्ट्रात सुरू असलेल्या नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्या राज्य संघटनेच्या निर्देशाप्रमाणे राज्यभर सुरू असलेल्या संपामुळे सर्वसामान्य जनतेची मोठी गैरसोय होत आहे. अधिकाऱ्यांनंतर कार्यालयात कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहून जनतेची काम मार्गी लागावीत, अशी अपेक्षा सर्वसामान्यांची असते. गेली दोन दिवस सुरू असलेल्या संपामुळे कणकवली तहसील कार्यालयातील उपस्थित महसूल सहाय्यक व अव्वल कारकून हे काम करतात, पण वेळेवर कार्यालयात न येणे आणि जेवणाच्या वेळेत उपस्थित न राहणे, अशी परिस्थिती दिसत आहे. महसूल शाखेमध्ये एकही महसूल सहाय्यक किंवा अव्वल कारकून उपस्थित नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नायब तहसीलदार आणि तहसीलदार हे जरी संपावर असले तरी कर्मचाऱ्यांनी आपले काम वेळेत येऊन केले तर सर्वसामान्यांची कामे काही प्रमाणात खोळंबणार नाहीत, त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी जनतेतून होत आहे.