
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा मुख्यालय शाळेत नुकताच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल जाधव, उपाध्यक्ष राजेश पावस्कर, शिक्षणतज्ञ जनार्दन गोसावी, सदस्य शाळेचे मुख्याध्यापक अनुजा चव्हाण, शिक्षकवृंद, इयत्ता चौथीच्या वर्गाचे पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत प्रामाणिकपणा, मेहनत व शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पालकांनी शालेय इमारतीच्या खिडक्या दुरुस्तीसाठी आर्थिक निधी शाळेला उपलब्ध करून दिला.हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.










