कुडाळ : आज विज्ञान युगात मानवाने अथक प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाने तर गरुडझेप घेतली आहे. आज टूजी, थ्रीजी, फोरजी व आताचे फाईव्ह जी जरी आले असले तरी मात्र आपल्या जीवनाला योग्य व विधायक दिशा देण्यासाठी गुरुजींचे स्थान अबाधितच आहे आणि ते अनंत काळापर्यंत अबाधितच राहील, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी हुमरस येथे केले.
कुडाळ तालुक्यातील हुमरस येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पक्ष कुडाळ, शिवसेना शिंदे गट व हुमरस ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ शिक्षक, गुरुजनांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. रुपेश पाटील उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला उत्सवमुर्ती ज्येष्ठ गुरुजन वि. न. आकेरकर, श्री. केळुसकर गुरुजी, गणेश घाडी गुरुजी, बांबुळकर गुरुजी उपस्थित होते. विशेष अतिथी मान्यवर म्हणून हुमरस गावाचे सरपंच सिताराम तेली, उपसरपंच प्रवीण वारंग, भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, शिवसेना महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा कुडाळकर, शिवसेना तालुकाध्यक्ष योगेश तुळसकर, ज्येष्ठ नागरिक ज. मु. कदम, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक शिवलकर, पोलीस पाटील सुरेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परेश वारंग, माजी सरपंच सोनू मेस्त्री, बूथ अध्यक्ष समीर मांगले, शिवसेना शाखाप्रमुख एकनाथ परब आदी उपस्थित होते.
मोबाईलचा मोह टाळा - प्रा. रुपेश पाटील
यावेळी मुख्य मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अलीकडे पालक आपल्या मुलांसमोर मोबाईल वापरतात आणि पालकच मोबाईल जास्त वापरत असल्यामुळे साहजिकच मुलांच्या मनावर मोबाईल वापरण्याचे संस्कार आपोआप बिंबवले जातात. अशावेळी पालकांनी मोबाईल वापरण्याचा मोह टाळणे आवश्यक आहे. सर्वेक्षणानुसार तब्बल साडेचार तास मुले मोबाईल वापरतात. म्हणजेच वर्षाचे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ मुलांजवळ मोबाईल असतो. हा व्यर्थ असलेला वेळेचा भाग जर विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यात लावला तर निश्चितच त्यांच्या जीवनाला योग्य दिशा प्राप्त होऊन ते अधिकारी पदापर्यंत पोहोचतील, असा आशावाद प्रा. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य श्रुती चिपकर, सुमन कुडकर, ग्रामसेवक बाळासाहेब फुंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तळवणेकर, सहाय्यक शिक्षक श्री. दिघे गुरुजी, कालेलकर गुरुजी, श्रीमती बांदेलकर बाई, ग्रामस्थ विष्णू परब, जया गोरे, प्रताप परब, अरुण मेस्त्री, सुधाकर मेस्त्री, संतोष पाटकर, दिलीप हुमरसकर, गोविंद स्वामी, सुनीता तेली, गीतेश मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रासताविक सरपंच सिताराम तेली यांनी केले. तर बहारदार सूत्रसंचालन निलेश तेली यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.