
कणकवली : शेततळीच्या बांधावरून चालताना पाय घसरून तळ्यात पडल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. बुद्धिवान भोरू चव्हाण (६३, रा. आयनल मणेरीवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुद्धिवान चव्हाण हे गावातील खानावळीमध्ये जेवणाकरिता जातो, असे सांगून सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले. मात्र, ते सायंकाळी उशिरापर्यंत परत घरी परतले नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी सर्व शोध घेतला असता त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास शेततळ्यात तरंगताना दिसून आला. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांच्या मदतीने तळ्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आला. मयत बुद्धिवान चव्हाण तेथीलच मनोहर भोरू चव्हाण (६१, रा. आयनल मणेरीवाडी) यांच्या काजू बागेत कामाला गेले होते. ते शेततळीच्या बांधावरून चालत जात असताना तोल जाऊन शेततळीमध्ये पडले आणि तेथेच त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा अशी माहिती मनोहर चव्हाण यांनी खबरीमध्ये दिली आहे. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली असून अधिक तपास हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत.