
सावंतवाडी : शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि येथील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर परिषद प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. यामध्ये पत्रकारांसाठी अद्ययावत 'पत्रकार भवन', शहराची पार्किंग समस्या, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि ऐतिहासिक मोती तलावाचे संवर्धन या विषयांना प्राधान्य दिले जाणार असल्याची ग्वाही प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिली. सावंतवाडी नगर परिषदेच्या पत्रकार कक्षाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, जिल्हा खजिनदार ॲड. संतोष सावंत, सहसचिव विनायक गांवस, प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अनंत जाधव, व्हाईस मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धीप्रमुख हरिश्चंद्र पवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी राजू तावडे, माजी तालुका सचिव सागर चव्हाण तसेच सिद्धेश सावंत, आनंद धोंड, जतिन भिसे, भुवन नाईक आदी प्रिंट आणि सोशल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.
तालुक्यातील पत्रकारांसाठी सर्व सोयींनी युक्त असे 'पत्रकार भवन' उभारण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल. सध्याच्या पत्रकार कक्षात आवश्यक सुविधा वाढवण्याबाबत आगामी स्थायी समितीच्या बैठकीत तातडीने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन निरवडेकर यांनी दिले. शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता, पार्किंगसाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. पणजी (गोवा) शहराच्या धर्तीवर इमारतींच्या वरील मजल्यावर पार्किंग करण्याबाबत विचार सुरू आहे. पार्किंगच्या जागांवर पांढरे पट्टे मारून शिस्तबद्ध दुचाकी व चारचाकी पार्किंग सुरू केली जाईल. व्यापाऱ्यांशी चर्चा करून आणि सुवर्णमध्य साधून 'वन-वे' वाहतुकीचा पर्याय अवलंबला जाईल. दरम्यान, मोती तलावाच्या काठावर सध्या असलेली ३४ झाडे तलावाचा कठडा आणि फुटपाथ कमकुवत करत आहेत. यावर उपाय म्हणून सध्याच्या झाडांऐवजी १०० नवीन सावली देणारी, फळझाडे आणि पक्षांना आकर्षित करणारी झाडे लावली जातील. यासाठी 'वृक्ष संवर्धन समिती' नियुक्त करण्यात आली असून, त्यांच्या शिफारशीनुसारच वैज्ञानिक पद्धतीने वृक्षारोपण केले जाईल.
आरोग्य आणि पायाभूत सुविधा
नगर परिषदेच्या दवाखान्यात रुग्णसंख्या वाढवून उत्तम सेवा देण्यावर भर दिला जात आहे. तसेच, अग्निशामक दलाची इमारत येत्या दीड वर्षात सुसज्ज करून त्यावर अतिरिक्त मजला बांधला जाईल. नगर परिषदेच्या मागील मोकळ्या जागेचा वापर पार्किंगसाठी करण्याबाबतही प्रशासन सकारात्मक आहे. शाळा सुटण्याच्या वेळी होणारी गर्दी आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर शाळांना खाजगी सुरक्षारक्षक नेमण्याबाबत नगर परिषद पत्रव्यवहार करणार आहे. यामुळे वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होईल आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित रस्ता पार करता येणार आहे.










