
सावंतवाडी : गणेश चतुर्थीपूर्वी सावंतवाडी शहरात नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी भटवाडी परिसरात जे खड्डे खोदले होते, ते दिवाळी आली तरी अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. नवरात्रोत्सव, दसरा आणि आता दिवाळीसारखे मोठे सण या खड्ड्यांतूनच जात असल्याने नागरिकांमध्ये नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भटवाडीतील लक्ष्मीनारायण मंदिरापासून ते बोरजिस वाड्यापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी हे मोठमोठे खड्डे पडले आहेत. कोलगाव आणि निरूखेवाडीपर्यंत जाणारा हा रस्ता वर्दळीचा असून, या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांसह वाहनांचे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये नागरिक जखमी झाले आहेत. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी टाकल्यानंतर हे खड्डे बुजवण्यासाठी केवळ खडी टाकून 'मलमपट्टी' केली आहे. ही खडी रस्त्यावर पसरल्यामुळे रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे. दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागते, तर चारचाकी वाहनांना बाजू देताना खडीमुळे अपघात होत आहेत.
पाणीपुरवठा विभागाला या खड्ड्यांकडे लक्ष कधी देणार, असा सवाल नागरिक करत आहेत. दरम्यान नव्याने टाकण्यात आलेली पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्यामुळे सर्वत्र रस्ता सर्वत्र जलमय झाला होता नुकतेच या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले यामुळे आणखी दुसरा एक खड्डा रस्त्याच्या बाजूला काढण्यात आलेला आहे हाही खड्डा धोकादायक बनला आहे. प्रशासनाकडून पावसाचे कारण दिले जात होते, मात्र परतीचा पाऊस थांबून आठ दिवस उलटले तरी खड्डे बुजवण्यासाठी कोणतेही काम सुरू झालेले नाही. पाणीपुरवठा विभागाने या खड्ड्यांवर खडी टाकून डांबरीकरण करून खड्डे बुजवणार असल्याचे आश्वासन दिले होते, पण ते केवळ आश्वासनच ठरले आहे. गणेशोत्सवाच्या आगमनापासून सुरू झालेली खड्ड्यांची समस्या नवरात्र, दसरा पार करून आता दिवाळीतही कायम आहे. यामुळे नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.