सावंतवाडीत होणार जिल्हा साहित्य संमेलन !

श्रीराम वाचन मंदिराच्या प्रस्तावास मान्यता : प्रा. बांदेकर
Edited by: विनायक गांवस
Published on: September 15, 2025 19:35 PM
views 15  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडीत होणार असून यासाठी श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा विभाग, सावंतवाडी या संस्थेच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. डिसेंबर महिन्यात राज्यातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत हे साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य अकादमी पुरस्कार पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी दिली. 'जिल्ह्यातील अलक्षीत साहित्य' पुढे आणण्याचा मुख्य उद्देश संमेलनाचा असल्याचे त्यांनी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भवन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे उपस्थित होते. प्रा. बांदेकर म्हणाले, साहित्य, संस्कृती व कला क्षेत्रात कार्य करणार हे मंडळ असून विश्वास पाटील यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडी नगरीत होणार असून यासाठी ५ लाख रूपये शासन दिलेत. जिल्ह्यातून यासाठी ९ प्रस्ताव गेले होते. यात श्रीराम वाचन मंदिराचा संस्थेचाही प्रस्ताव यात होता. साहित्य संमेलनासाठी तो प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

दरम्यान, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अशी संमेलने होणार आहेत. या निधीतून दिवसभर चालणारे उपक्रम घेण्यात येणार आहे. जिल्हा संमेलन साधारण २० डिसेंबर २०२५ ला हे घेण्याचा आमचा मानस आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे साहित्यिक होऊन गेलेत. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची ही भूमी आहे. मात्र, काही साहित्यिक दुर्लक्षीत देखील राहिलेत. अशा साहित्यांना व्यासपीठ देण्यासाठी 'जिल्ह्यातील अलक्षीत साहित्य' या धर्तीवर हे संमेलन होणार आहे. कवी संमेलन देखील होणार आहे. या संमेलनाचा अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक असणार असून उद्घाटक जिल्ह्यातील राहतील. त्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. उद्घाटन, परिसंवाद, मुलाखत व दुपारच्या सत्रात कवी संमेलन, परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. यासाठी महाराष्ट्र व जिल्हातील साहित्यिक उपस्थित असणार आहे. बऱ्याच दशकानंतर हे साहित्य संमेलन जिल्ह्यात होत आहे. यामध्ये जुन्या साहित्यिक, ज्येष्ठ  कलावंतांचा, साहित्य निर्मितीत योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्याचा आमचा मानस आहे. सावंतवाडी शहरात हे संमेलन होईल, अशी माहिती त्यांनी दिली.