
सावंतवाडी : शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी दिल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. माझ्याकडे असलेल्या चारही खात्यांचा आढावा तालुकावर घेणार असून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माझा अधिक भर राहिल असा विश्वास राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले. जिल्हा दौऱ्यावर असताना माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी कदम यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
मंत्री कदम म्हणाले, महसूल व ग्रामविकास खाती ही ग्रामीण जनतेशी निगडीत खाती आहेत. तसेच अन्न नागरी पुरवठा व अन्न औषध प्रशासनाच्या चारही खात्यांचा तालुकानिहाय आढावा मी घेत आहोत. येथील प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी दिल्यानंतर येथील संघटना मजबूत करण्यासाठी दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हातभार लावण्यासाठी मी आलो आहे. मंत्री म्हणून शिवसैनिकांचे प्रश्नही सोडविण्यावर माझा भर आहे. केसरकर हे अनुभवी नेते असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावू असा विश्वास व्यक्त केला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू चोरीचा आढावा घेत असताना क्रश सॅन्डचा पर्याय त्यावर आहे. त्यामुळे वाळू चोरी थांबवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. नवीन वाळूच धोरण अधिकाऱ्यांना अवलंबय का तसेच किती जणांवर कारवाई केली गेलीय याचाही आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, माजी मंत्री, आम. केसरकर म्हणाले, आंबोली, चौकुळ, गेळेचा फक्त वन खात्याच्या प्रश्न बाकी आहे. महसूलचा प्रश्न सुटला असून वरिष्ठ पातळीवर त्यावर काम सुरू आहे. तो लवकरच मार्गी लागेल असे स्पष्ट केले. यावेळी श्री. केसरकर यांच्याकडून राज्यमंत्री योगेश कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, उपनेते संजय आंग्रे, अशोक दळवी, सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.