
सावंतवाडी : सावंतवाडीमध्ये आयोजित तीन दिवसीय भव्य 'नाट्यमहोत्सवा'चा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. शुभारंभाला 'भगदत्त वध' हे नाटक सादर करण्यात आले. याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त याचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील गोविंद चित्रमंदिरात या नाट्यमहोत्सवास प्रारंभ झाला. माजी उपनगराध्यक्ष श्री. पोकळे यांच्या उपस्थितीत या उत्सवास प्रारंभ झाला. यावेळी नारदाची भुमिका साकारणारे ज्येष्ठ दशावतार कलावंत विठ्ठल गांवकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हा प्रमुख विनायक दळवी, महिला शहरप्रमुख भारती मोरे, झेवियर फर्नांडिस, वासुदेव होडावडेकर, सुहास कोळसुलकर, परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका दिपाली सावंत, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, अर्चित पोकळे, निखिल सावंत, पुजा सोन्सुरकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी 'राजा सोमदत्त अर्थात सदोबा पाटील' तर, महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध ऐतिहासिक नाटक 'रायगडाला जेव्हा जाग येते' हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.