
सावंतवाडी : राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यावर मराठी माणसांचा विजय म्हणून वरळी डोममध्ये आज कार्यक्रम पार पडला. दोन ठाकरे बंधू तब्बल १९ वर्षांनी एकत्र येत दोघांनीही दमदार भाषणे केली. यानंतर सिंधुदुर्गात सावंतवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासाची ही नांदी आहे. राज्याच्या एकजुटीसाठी आम्ही जल्लोष साजरा करत असल्याची भावना उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली. मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर म्हणाले, मुंबईत मराठी माणूस आज एकत्र झाला. सिंधुदुर्गात देखील आज ते झालं आहे. मराठी माणसाच्या वाटेला कोणी गेलं की तो कसा पेटतो ते आज कळलं असेल असं मत त्यांनी व्यक्त केले. सेना तालुकाप्रमुख मायकल डिसोझा म्हणाले, मराठी जनांचा हा आनंद दिवस आहे. बाहेरील शक्ति राज्यात अतिक्रमण करू पहाता असताना मराठी मनाचा विचार करून ठाकरे बंधू एकत्र आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर, सेना तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, सावंतवाडी शहर अध्यक्ष ॲड. राजू कासकर, कट्टर शिवसैनिक शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, आशिष सुभेदार, राजन पवार, रमेश गावकर, मळगाव विभाग अध्यक्ष राकेश परब, मिलिंद देसाई, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर, सिद्धेश आखेरकर, दिनेश मुळीक, श्रीराम सावंत आदी शिव-मनसैनिक उपस्थित होते