सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज १० वर्षे पूर्ण

भुमिपुजन दगडाचा केक कापून निषेध
Edited by: विनायक गांवस
Published on: June 27, 2025 13:09 PM
views 250  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज २७ जून रोजी १० वर्षे पूर्ण होऊन देखील ते अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर  'वाढदिवस साजरा केला. साखर वाटत, भुमिपुजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध नोंदविण्यात आला. 

सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले. मात्र, दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून, केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे प्रशासन, प्रवाशी यांना साखर वाटून गांधीगिरी मार्गान प्रशासनाचे लक्ष  वेधण्यात आले. 

यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर म्हणाले, १० वर्ष प्रकल्प रखडलेला आहे. तिन्ही सार्वत्रिक निवडणूक एकाच पक्षाची सत्ता राज्यात आलेली आहेत. त्याच सरकारने भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प पूर्ण होत नसेल तरी ती क्षरमेची बाब आहे. सरकारला जाग आणण्यासाठी व अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे‌. केवळ रेल्वे मंत्री बदलले म्हणून प्रकल्प अर्धवट ठेवणं योग्य नाही. प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याच जाहीर करा असं आवाहन त्यांनी केलं‌. तर ज्या दगडावर नारळ फोडून भुमिपूजन केलं तो दगड केक स्वरूपात आम्ही कापून अर्धवट कामाचा निषेध केला. जन आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नसल्याने दगडी सरकारला हा दगड होता. त्यामुळे निदान आता तरी सरकारनं कोकणवासीयांना न्याय द्यावा. प्रवाशांची होणारी गैरसोय रोखावी असं मत सचिव मिहिर मठकर यांनी व्यक्त केले. तसेच गणेशोत्सवापूर्वी रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास आणून चाकरमान्यांचे होणारे हाल, अपेष्टा रोखाव्यात असे मत उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले. उपस्थित पोलिस, रेल्वे कर्मचारी, प्रवासी, रिक्षा चालक यांना साखर वाटून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर,सल्लागार सुभाष शिरसाट, सल्लागार अँड सायली दुभाषी, पुंडलिक दळवी सौ.बांदेकर,भूषण बांदिवडेकर,पांडुरंग राऊळ,सागर तळवडेकर,तेजस पोयेकर,अभिमन्यू लोंढे,हरिश्चंद्र पवार,सिद्धार्थ निंबाळकर,मंगेश सावंत, चंद्रकांत राघो कोरगावकर, रवी सातवळेकर,पांडुरंग परब,नारायण मसुरकर,प्रमोद खानोलकर, रफिक मेमन, विनायक राऊळ, लवू नाईक, एकनाथ नाटेकर, राजेंद्र वरडे, प्रकाश भाईंडकर, दिलीप कुलकर्णी,काका पांढरेनितीन गावडे, विनायक गांवस आदींसह रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा व्यावसायिक, रेल्वे प्रवासी उपस्थित होते.