विरोधाला विरोध जुमानणार नाही !

'शक्तीपीठ'ला शिवसेनेचा पाठिंबा: जिल्हाप्रमुख संजू परब
Edited by:
Published on: May 04, 2025 13:19 PM
views 26  views

सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. विरोधाला विरोध जुमानणार नाही. ज्या शेतकरी, प्रकल्पग्रस्तांची भूमिका असेल ती निश्चितच समजून घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल. तर फुकेरी गडाची एक इंच जागा यात जाणार नाही याची दक्षता घेऊ, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहेत असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. तर सावंतवाडी शहरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पर्यटक शहरात कसे वळतील यासाठी दीपक केसरकर कार्यरत आहेत. ते त्यासाठी सक्षम असल्याचे श्री.‌परब म्हणाले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे. हा महामार्ग झाल्याने इथल्या उद्योजकांना, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. इथला आंबा, काजू, फणस, नारळ, कोकम आदी फळे नागपूरला 10 तासात पोहोचतील. त्यामुळे मोठा रोजगार निर्माण होईल. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांची भूमिका ही शिवसेनेची भुमिका आहे असं मत व्यक्त केले.

दरम्यान, ज्यांच आयुष्य लाकूड तोड, जंगल तोडीत गेलं ते आज शक्तीपीठकर बोलताना पर्यावरणाच्या काळजीचा आव आणत आहे. त्यांचा विरोधामागे हेतू वेगळा आहे. बांदा येथेही विरोध झाला. मात्र, विरोधाला न जुमानता हा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण केला जाईल. बांदा सरपंच यांची समजूत काढली जाईल. ज्यांची शेती, बागायती, घर यात जाणार आहे अशा गोरगरिबांची काही मागणी असल्यास निश्चित त्यावर तोडगा काढला जाईल. योग्य मोबदला त्यांना कसा मिळेल यासाठी दीपक केसरकर, निलेश राणे यांच आम्ही लक्ष वेधू. विरोध करत आहेत अशांच्या मागण्या देखील समजून घेऊन सोडवल्या जातील. तसेच शक्तीपीठ महामार्गामुळे फुकेरी गडाच्या एक इंच जागेला बाधा येणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, छत्रपती शिवराय आमचा दैवत आहेत असं मत त्यांनी व्यक्त केल.

तसेच मुंबई-गोवा महामार्ग जरी बाहेरून गेला तरी पर्यटक शहरात येत आहेत. निसर्गसंपन्न, ऐतिहासिक असं हे शहर आहे. त्यामुळे पर्यटक इथे कसे वळतील यासाठी दीपक केसरकर कार्यरत आहेत‌.‌ पर्यटन योजना, खाद्यसंस्कृती आदींच्या माध्यमातून शहराकडे पर्यटक वळवण्याचा मानस आमचा आहे. शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महामार्गाचा मोठा फरक शहरावर होणार नाही अशी भूमिका श्री. परब यांनी मांडली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, गुरु सावंत, पप्पू सावंत, आदी उपस्थित होते.