कणकवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला. आमदार अपात्रतेबाबतचा हा निर्णय राज्याच्या राजकारणाला भविष्यात कलाटणी देणारा ठरला असून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का आहे. या बाबत प्रतिक्रिया देताना सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांनी सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय आग्रे पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःला पक्षाचा कधीच मालक म्हटले नाही. हुकूमशाही चालवली नाही. लोकशाही मार्गाने कायद्याचा आधार घेत शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सत्ता पालट केला. भरत गोगावले यांची प्रतोद पदी केलेली निवड योग्य असल्याचेही विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी नमूद केले आहे. गोगावले यांनी बजावलेले व्हिप वैध असल्याचाही निर्णय दिला आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा विधानसभा अध्यक्षाचा निर्णय हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकांच्या मनातील निर्णय असल्याचेही संजय आग्रे म्हणाले.