रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा : जिल्हाधिकारी

Edited by: ब्युरो
Published on: January 03, 2024 18:39 PM
views 202  views

सिंधुदुर्गनगरी :  महामार्गावरील अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून नियमांचे पालन करणे ही स्वयंशिस्त बनली पाहिजे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि नगरपालिका या सर्व विभागांनी रस्त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारी मार्किंग, रम्बलर, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर मार्किंग, वेग मर्यादा याबाबतची कार्यवाही करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. रस्त्यावरील वेगवेगळे नाम फलक, शाळा,महाविद्यालय, रुग्णालय इत्यादीबाबत माहिती दर्शविणारे फलक रस्त्याच्या बाजूला उभारावेत अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिल्या.


            रस्ता सुरक्षिततेबाबत जिल्हास्तरावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीधर पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली 


            जिल्हाधिकारी म्हणाले मागील तीन वर्षातील अपघातांचे शास्त्रोक्त विश्लेषण करावे, ब्लॅकस्पॉट, धोकादायक ठिकाणांची माहिती घेऊन त्यावर तात्पुरत्या व कायमस्वरुपी उपायोजना कराव्यात, सर्व प्रमुख रस्त्यांवर वेगमर्यादेचे फलक, स्पीड डिटेक्शन कॅमेरे, HIGH MAST LAMP  बसविणे, इर्मजन्सी रिस्पॉन्स टाईम कमी करणे, जखमींना गोल्डन अवरमध्ये तात्काळ मदत मिळावी याकरिता जी व्यक्ती अपघतामध्ये मदतनीस (Golden Samaritans) म्हणून कार्य करते अशा व्यक्तींना प्रोत्साहन द्यावे, ट्रामा केंअर सेंटर कार्यान्वित करणे, समुपदेशन केंद्र निर्माण करणे, दुचाकी पथक कार्यान्वित करणे, रात्रीची गस्त वाढविणे, जिल्ह्यात ट्राफीक पार्क, प्रशिक्षण संस्था उभारणे, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्याना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन शिबीरे नियमित आयोजित करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.


            अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले म्हणाले जिल्ह्यात पुर्वी झालेल्या अपघातांचा अभ्यास करुन धोकादायक ठिकाणांची सूची तयार करुन अपघात रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याचे निर्देश देखील यावेळी दिले.