
रत्नागिरी : सह्याद्रि शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, भेलसई ता. खेड, जि. रत्नागिरी या विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025- 26 या शैक्षणिक वर्षी इयत्ता आठवी च्या वर्गामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव,त्यांचे स्वागत व इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके यांचे वितरण कार्यक्रम संपन्न झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शालेय समितीचे अध्यक्ष शंकर धाडवे यांच्या अध्यक्षतेखालील हे सर्व कार्यक्रम संपन्न झाले.यावेळी विद्यालयात नवीन प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सवाद्य स्वागत,त्यांचे औक्षण व त्यांना पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी शालेय समितीचे चेअरमन शंकर धावडे, अनंत कदम, रमण तांबे, सौ रोहिणी कदम, भेलसई गावच्या सरपंच सौ. मयुरी कदम, माजी सरपंच एकनाथ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शालेय समितीच्या चेअरमन यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण संस्कारक्षम शिक्षण प्राप्त करावे असे आवाहन त्यांनी केले.
भेलसई गावचे माजी सरपंच एकनाथ कदम यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सह्याद्रि शिक्षण संस्था स्थापन करताना स्व. निकम साहेब यांचे प्रयत्न विद्यार्थ्यांच्या समोर विशद केले. आज सह्याद्रीचा वटवृक्ष बहरलेला आहे. आपण त्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतोय हे आपले परम भाग्य असे मनापासून नमूद केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश वावरे सर यांनी उपस्थितांना विद्यालयातील शैक्षणिक आणि भौतिक सुविधांची माहिती दिली. चालू शैक्षणिक वर्षात राबविले जाणारे उपक्रम, कार्यक्रम, विविध स्पर्धा व स्पर्धा परीक्षा याविषयी थोडक्यात माहिती सांगितली.यावेळी त्यांनी नवीन व जुन्या अशा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांनी चांगला अभ्यास करावा, विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे व यश संपादन करावे,शालेय शिस्तीचे पालन करावे, नियमितपणे शाळेत उपस्थित राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी,पाठयपुस्तकांचे नियमित वाचन करावे, कोणत्याही अडीअडचणी असतील तर संपर्क साधावा असे विद्यार्थ्यांना व पालकांना आवाहन केले.
विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. भाग्यरेखा पवार यांनी यावेळी सांगितले की,विद्यालयात संगणक कक्ष, क्लासरूम,भव्य क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय, व प्रयोगशाळा, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था,वापरासाठी मुबलक पाणी, मुलींचे व मुलांचे स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रथमोपचार साहित्य, गुणवत्ता वाढीसाठी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा,एन एम एम एस परीक्षा यांच्या तयारीसाठी जादा मार्गदर्शन, दहावी सराव परीक्षा अशा सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यालयाने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेले आहे.
यावेळी सौ भाग्यरेखा पवार यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.या कार्यक्रमासाठी नवीन प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सौ. मानसी पवार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सौ भागयरेखा पवार यांनी सर्वांचे आभार मानले.