सावंतवाडी : सरकार कोसळल्यानंतर शिंदेकडे पळून जाणाऱ्या आमदारांना रोखण्याकरीता जाब विचारण्याकरीता युवासैनिक तत्पर होता. अशाच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या निष्ठावंत युवासैनिकांनी तसं केलं असेल, त्याचा मला अभिमान आहे असं विधान युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांनी करत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना टोला हाणला. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौऱ्यात एकाच दिवशी सहा महाविद्यालयीन कक्षाची स्थापना केली. युवासैनिकांनी यासाठी मेहनत घेतली आहे. कॉलेज विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी या कक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहे. पुढील काळात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहे. विद्यापीठात युवासेनेचे दहा पैकी दहा सिनेट सदस्य आहेत. १० सप्टेंबरला ही निवडणूक होणार होती. पण, सरकार कोणतीच निवडणूक घ्यायला तयार नाही आहे. ही निवडणूक पुढे ढकलली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची धास्ती भाजपनं घेतली आहे. आम्ही जिंकणार याची खात्री भाजपला असल्यानं निवडणूका पुढे ढकलण्यात आल्यात. जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दहा पैकी दहा जागांवर जिंकू असा दावा वरूण सरदेसाई यांनी केला.
तर पळून जाणाऱ्या आमदारांना रोखण्याकरीता जाब विचारण्याकरीता युवासैनिक तत्पर होता. अशाच कट्टर युवासैनिकांनी ते केलं. याचा मला अभिमान आहे असं मत व्यक्त करत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे आदींसह उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.