
मागील दीड वर्ष रंगीत कारंजा बंद !
मालवण : मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही हे सिद्ध होत आहे. आम्ही केलेल्या सूचनांची कात्रण करून फाईलला लावण्यापेक्षा केबिन सोडून जर प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली असती तर आमच्या काळात सुशोभीकरण केलेल्या एका गार्डनची अशी वाताहत लागली नसती असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी म्हंटले आहे.
महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे, मालवण शहराच्या मध्यवर्ती असलेल्या फोवकांडा पिंपळ येथे मालवण नगर परिषदेचं गार्डन आहे. आमच्या कालावधीमध्ये या गार्डनचे सुशोभीकरण करण्यात आले. यामध्ये रंगीत कारंजा, डेकोरेटिव्ह लाईट बसविण्यात आल्या. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे गार्डन असल्याने पर्यटन दृष्ट्या सौदर्य वाढविणारे आहे. परंतु हेच गार्डन मागील दीड वर्षांपासून समस्याग्रस्त आहे. रंगीत कारंजा बंद आहे. आता तिकडे कारंज्याच्या साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या झालेल्या आहेत. गेट मोडलेले आहे, लावलेल्या डेकोरेटिव्ह लाईट बंद आहेत, आणि याबाबत मागील दीड वर्ष आवाज उठवूनही काहीही कार्यवाही झालेली नाही.
एकीकडे आपल्या जिल्ह्यातील नगर पालिका स्वच्छ सर्वेक्षण मध्ये बक्षीस मिळवत असताना मालवण नगर पालिका सुशेगात आहे आणि ती मालवणच्या लोंकाच्या आरोग्याशी खेळत आहे. धूर फवारणी, औषध फवारणी करून डासांची उत्पत्ती स्थानके नष्ट करणे आवश्यक असताना याबाबत कुठलीही उपाययोजना केली जात नाही. उलट सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी अस्वच्छता होताना दिसत आहे. या ठिकाणची स्वच्छता करणाऱ्या ठेकेदारावर कुणाचा अंकुश नाही. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे दिसत नाही. सध्या या ठिकाणी फोवकांडा रिक्षा मंडळाकडून स्वयंपुर्तीने देखभाल सुरु आहे .
फक्त एक दिवसाचे स्वच्छतेचे इव्हेंट करायचे, त्यामध्ये नागरिकांना सामाजिक संस्थेना सहभागी करून घेऊन फक्त शासनाला दाखविण्या इतपत फोटो सेशन करून घेतले जात आहे. एखाद्या कामाबाबत मागील दीड वर्षेपासून सातत्याने सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असेल तर मुख्याधिकारी हे मनमानी पद्धतीने काम करीत आहेत आणि त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही हे सिद्ध होत आहे .
आम्ही केलेल्या सूचनांची कात्रण करून फाईलला लावण्यापेक्षा केबिन सोडून जर प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली असती तर आमच्या काळात सुशोभीकरण केलेल्या एका गार्डनची अशी वाताहत लागली नसती असे कांदळगावकर यांनी म्हंटले आहे.