मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक

१५ मेपूर्वी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करा; आपत्ती आराखडा अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 20, 2026 20:43 PM
views 24  views

सिंधुदुर्गनगरी : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काळ व प्रभावी मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांना मान्सूनपूर्व कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय साधून सज्ज राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सुनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, पोलिस उपअधीक्षक श्वेता खाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत तसेच महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, वीज वितरण, ग्रामविकास, नगरपरिषद तसेच पोलीस विभाग यांचा सहभाग होता. प्रत्येक विभागाने आपापल्या तयारीचा आढावा सादर करताना संभाव्य अडचणी व उपाययोजना मांडल्या.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी धोकादायक झाडे व जीर्ण इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. पूरप्रवण क्षेत्रांची अचूक नोंद करून तेथे विशेष दक्षता घेण्यास सांगितले. रस्ते व पुलांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करून वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला असून वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी आवश्यक साहित्यसाठा व मनुष्यबळ तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आरोग्य विभागाला संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

ग्रामपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समित्या सक्रिय करून जनजागृती मोहीम राबविण्यावर विशेष भर देण्यात यावा,  मान्सून काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे आदेश देताना, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा व प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दामिनी, सचेत आणि भूकंप या ॲप विषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हे तीनही ॲप्स आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. दामिनी हे ॲप विजेच्या कडकडाट (Lightning) बाबत पूर्वसूचना देते. आपल्या परिसरात पुढील काही मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असल्यास अलर्ट मिळतो. सचेत ॲपद्वारे पूर, चक्रीवादळ, भूकंप, त्सुनामी इत्यादी आपत्तींबाबत वेळेवर सूचना मिळते तर भूकंप हे ॲप भूकंपाच्या धक्क्यांची माहिती आणि अलर्ट मिळण्यासाठी वापरले जाते. तरी नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.