सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे येथे बैलाच्या हल्ल्यात एका ५५ वर्षीय वृद्धाचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
सदर घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली होती. शंकर भास्कर राऊळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बांबोळी (गोवा) येथे उपचारार्थ नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, राऊळ हे मंगळवारी सकाळी आपल्या मालकीचे बैल घेऊन चरण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी त्यांच्या एका बैलाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. यात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळी (गोवा) येथे रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान सदर घटनेची सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.