सावंतवाडी : रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागला तरच निरवडे पंचक्रोशीसह तालुक्याचा विकास होऊन येथील युवकांना रोजगार मिळणार आहे. या प्रश्नांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. मात्र, याबाबत योग्य तो सकारात्मक निर्णय न झाल्यास २६ जानेवारीला आंदोलन करु ,या लढ्याला तुम्ही सर्वानी साथ द्या,असे आवाहन निरवडे येथे झालेल्या बैठकीत कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष अॅड. संदिप निंबाळकर यांनी केले.
आता यापुढे गप्प बसून चालणार नाही. त्यामुळे गावागावात जाऊन रेल्वेच्या रखडलेल्या प्रश्नांबाबत जनजागृती करु आणि एकत्रित लढा देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. निरवडे येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि निरवडे, सोनुर्ली, वेत्ये, मातोंड, नेमळे, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत संदीप निंबाळकर बोलत होते. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना संघटनेचे सचिव मिहिर मठकर, उपाध्यक्ष सागर नाणोसकर, उपाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुका संपर्कप्रमुख भूषण बांदिवडेकर, निरवडे सरपंच सुहानी गावडे, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, नेमळे सरपंच दिपिका भैरे, मातोंड सरपंच मयूरी वडाचेपाटकर, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, आदेश जाधव, सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर, आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.