कणकवली : तालुक्यातील नरडवे गावातील गडनदी पात्रावरती मध्यम पाटबंधारे धरण प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाईल असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. नरडवे धरणग्रस्त कृती समितीच्या प्रकल्पग्रस्तांनी आज मंत्री चव्हाण यांची येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.
यामध्ये त्यांनी ज्या लोकांनी 65 टक्के रक्कम भरली आहे तसेच मुदतीमध्ये अर्ज केले आहेत अशा एकूण 347 व्यक्तींना त्याचा लाभ देण्यात यावा असे निवेदन पालकमंत्री चव्हाण यांना देण्यात आले
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष सुरेश ढवळ, उपाध्यक्ष अनिल ढवळ, सचिव संजय पवार, सदस्य रामदास नार्वेकर, मुंबई समितीचे अध्यक्ष लुईस डिसोजा, सहसचिव निलेश पेडणेकर आदींनी यावेळी भेट घेतली. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, गोट्या सावंत आदी मान्यवरही उपस्थित होते. नरडवे धरण पाटबंधारे प्रकल्पाचे काम गेले काही वर्षे रखडले आहे. या प्रकल्पाला केंद्राच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेतून निधी उपलब्ध झाला. मात्र प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न रखडले आहेत. गेल्या २५ वर्षात रखडलेल्या या प्रकल्पाकडे आलेल्या सर्व सरकारच्या लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची मोठी गैरसोय सुरू आहे. अनेक समस्यांमध्ये अडकलेले प्रकल्पग्रस्त गेली २५ वर्षे या समस्येला तोंड देत आहेत. अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली असून श्री. चव्हाण यांनी याबाबत तातडीने बैठक घेऊन योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन कृती समितीला दिले आहे. धरणग्रस्त आणि अधिकारी वर्ग यांच्या समवेत एकदा मीटिंग करून प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावू असा विश्वास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे