
सावंतवाडी : लोकसभेला मला ३२ हजारांच लीड तुम्ही दिलं. आता दीपक केसरकर यांना ५० हजारांच मताधिक्य देऊन विजयी करा. महिला उमेदवार सोडून उभे असलेल्या दोघांची डिपॉझिट जप्त करा असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले. मला तुमच्याकडून काही नको. फक्त, आमच्या दीपक केसरकर, निलेश, नितेशला आशीर्वाद द्या ! ही लोक कमीशन, दलालीमध्ये नाहीत. त्यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. सावंतवाडी येथील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
श्री. राणे म्हणाले, ही निवडणूक अतिमहत्त्वाची आहे. आपली माणसं कोण, त्यांच योगदान काय ? हे बघून मतदान करा, अमिषाला बळी पडू नका. कालपरवा जिल्ह्यात आलेले अजूनही फक्त मागत आहेत. सिंधुदुर्गला, महाराष्ट्राला यांनी काय दिल ? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी दोनदा मंत्रीमंडळाची पायरी चढली. महाराष्ट्रासाठी, कोकणासाठी यांच योगदान काय ? केसरकर आणि मी लोकांना प्रेम दिल इथला विकास केला. मुलभूत गरजा आम्ही दिल्या. एकतरी प्रकल्प ठाकरेंनी दिला का ? असा सवाल खा.राणेंनी केला.
माझी क्षमता सगळ्यांना माहीती आहे. गाढण्याची भाषा करणारा उद्धव ठाकरे माझ्याकडे बघू पण शकत नाही. ४० वर्ष शिवसेनेत रक्त सांडलेला मी शिवसैनिक आहे. तेव्हा हे फोटो काढत फिरत होते. अजूनही ते माणसात आलेले नाही असा टोला हाणला.
तसेच केसरकर यांनी येथे आमदारकीची हॅट्रिक केली. विकास केलेला एकीकडे उमेदवार तर दुसरीकडे कपडे नसलेला उमेदवार आहे. ग्रामपंचायतीतही हा उभा राहीलेला नाही. याला राज्यसभा हवी होती. निवडणूकीनंतर मी इडीच्या मागे लागणार आहे. पैसा कुठून येतो ? हे पहणार आहे. दुसऱ्यांना तर एकदा आमदार मी केले. एकही भाषण विधानपरिषदेत तो करू शकला नाही. कणकवलीतल्या लोकांनाही मदत करू शकला नाही. राणेंना सोडून गेला की त्या माणसाचा भाव ठाकरेंकडे वाढतो. दलाली करायची, लोकांचं सोशण करायचं काम तेलीनी केल. अशा लोकप्रतिनिधींना थारा देऊ नका. भौतिक सुविधा आम्ही निर्माण केल्यात. आम्हाला इथे आता नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत. हॉस्पिटलला लागणाऱ्या वस्तूंचा कारखाना आम्ही दोडामार्गला आणत आहोत. राजन तेलीनी कल्याण केलं अशा एकाच नाव सांगावं. समोरचे उमेदवार केसरकरांच्या तुलनेचे नाहीत. ही निवडणूक एकतर्फी झाली पाहिजे. इथली लोकं प्रामाणिक आहेत असे विधान राणेंनी केलं.
या निवडणूकीत चांगली माणसं निवडून द्या. केंद्रात मी आहे, राज्यात आपला अंकुश आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराला विजयी करा. आमच्याकडे कमिशनचा धंदा नाही. हा कोणाला ड्रायव्हिंग शिकवायला जायचा. चरीत्र नाही, प्रामाणिक नाही असा माणसाला बळी पडू नका. भाजपमध्येच त्याचे जास्त लाड झाले. कार्यकर्त्याला जेवढी काम दिली नाही तेवढी याला दिली. हा चिठ्ठ्या पाठवायचा, निधी आमच्या मंत्र्यांनी दिला असा टोला तेलींना हाणला. तर केवळ शिव्या देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. हा कपाळावर पडलेला माणूस आहे. योजना बंद करण्यापलीकडे तो काही करू शकत नाही. बाळासाहेबांची शिवसेना ही आता राहीली नाही. उद्धवची सेना तशी होऊ शकत नाही अशी टीका केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील गरीबी दूर केली. चारवेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांनी काय केलं ? लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याचा यांना अधिकार नाही. कॉग्रेसने काही दिलं नाही. दाडी वाढवून काहीजण फिरतायत अशी टीका राहुल गांधींवर केली. लोकसभेत बोलताही येत नाही ते पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र, मोदींनी सगळ्या वर्गांना मदत केली. गरीबांना हात दिला. जात, पात, धर्म न बघता मदत केली. ही दोन टकली मत मागत फिरत आहेत. यांना हे माहित आहे का ? मला ३५ हजारांच लीड तुम्ही दिलं. दीपक केसरकर यांना ५० हजारांच मताधिक्य देऊन विजयी करा. महिला उमेदवार सोडून उभे असलेल्या दोघांची डिपॉझिट जप्त करा असे आवाहन खा. राणेंनी यावेळी केले. रात्रीच्या अंधारात पैसा वाटप करण्याच काम ही मंडळी करत आहेत. लोकांना फसवणारे हे उमेदवार आहेत. निवडणूकीनंतर कॉलेज बाहेर गोव्यातून सप्लाय होणारा माल कोण आणत ? हे समोर आणणार, ब्राऊन शुगर कोणी विकत असेल तर पिढ्या बरबाद होऊ देणार नाही असा इशारा राणेंनी पोलिसांना दिला.
तसेच यांचे पैसे घेतलात तर देवळात नेऊन ठेवा. चुकीच्या मार्गांचे पैसे मी घरात आणले नाहीत. उद्योगधंदे करून माझ कुटुंब कमवत आहेत. दुसऱ्याच्या खिशात हात घालून पैसा मी कमावला नाही. राजकारणात आलो तेव्हाच मी आणि पत्तीन तशी शपथच घेतली. दिवसा न दिसणाऱ्या माजी खासदाराला नोटीस पाठवली आहे. भ्रष्टाचाराचे खोटे आरोप खपवून घेणार नाही असा इशारा विनायक राऊत यांना राणेंनी दिला. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच खंडन केले. माझं हॉस्पिटल एकदा येऊन बघा. अनेक डॉक्टर तिथे शिकत आहेत. आम्ही जे काम केलं तेवढं विरोधक करू शकले का ? एक बालवाडी तरी काढली का ? असा सवाल केला. आमदार असताना वडीलांच्या नावानं ट्रस्ट उभं केल. गोरगरिबांना यातून उपचार करण्यात येत आहेत. गेली अनेक वर्षे हे काम सुरू आहे. माझा जन्म जिल्हा आहे म्हणून कृतज्ञतेने काम करतो. आतापर्यंत मिळवलेल्या अकरा पदांचा फायदा जिल्ह्यासाठी केला. मला तुमच्याकडून दुसर काही नको. आमच्या केसरकर, निलेश, नितेशला आशीर्वाद द्या. ही लोक कमीशनमध्ये नाहीत. त्यांना विजयी करा. आम्ही सत्तेवर होतो,आहोत अन् राहणार आहे. त्यामुळे या फसव्या माणसांना साथ देऊ नका. हा माणूस चांगला आहे. लोकांना न्याय देणाऱ्या दीपक केसरकर यांना धनुष्य बाणाचे बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन राणेंनी केले. महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गांधी चौक येथे पार पडली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे उमेदवार निलेश राणे, युवराज लखमराजे भोंसले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप जिल्हा संघटक महेश सारंग, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर,राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, सुरेश गवस, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक दत्ता सामंत, संजू परब, केरळचे अँड. हरीकुमार आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.