मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता ४ वर्षे रखडला...!

चंदगड ग्रामस्थांचे २० ला उपोषण
Edited by: संदीप देसाई
Published on: February 04, 2024 12:11 PM
views 76  views

दोडामार्ग : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या शिवकालीन पारगड किल्ला जोडणारा मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता मार्गी लावण्यासाठी दोडामार्ग व चंदगड तालुक्यातील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्धार केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग येथे २० फेब्रुवारीला उपोषणाचा इशारा दिला आहे.  दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थ मावळे यांनी गेली अनेक वर्ष संघर्ष केला, अनेक आंदोलन, उपोषण  केल्यावर ४ वर्षापूर्वी मंजुरी मिळालेल्या त्या रस्त्याचे काम सुरू झाले खरे मात्र बांधकाम विभाग व वन विभाग यांच्या तसेच राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासिनतेमुळे सुरू झालेलं काम गेली चार वर्षे रखडले आहे. 

सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा सीमेवर वसलेल्या शिवकालीन पारगड किल्ला याला जोडणारा मोर्ले ते पारगड हा रस्ता मार्गी लावण्यासाठी गेल्या काही वर्षांत पारगड किल्ला, सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग मोर्ले गावात या ठिकाणी जवळपास ३२ आमरण तसेच बेमुदत उपोषणे केली. या नंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री असताना मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता मंजूर करून कामाला सुरुवात झाली.  पण गेल्या ४ वर्षापासून दोडामार्ग चंदगड हद्दीतील काम बंद पडले आहे. 

मोर्ले ते पारगड किल्ला यासाठी दोन्ही तालुक्यात वन विभाग यांची हद्द लागते यातील काही जागा दिली. हजारो झाडे तोडली, वन विभाग यांनी काही वर्षे मुदत देऊन त्या कालावधीत काम पूर्ण करावे असे निर्देश दिले होते. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत काम केले नाही.  त्यामुळे वन विभागाने  मुदत संपल्यावर काम करायला बंदी घातली. यानंतर त्याला मुदतवाढ घेणे ही बांधकाम विभागाची जबाबदारी होती. पण चार वर्षात प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे जो रस्ता केला होता तो तीन पावसाळ्यात वाहुन गेला आहे. रस्त्याला भले मोठे चर पडले आहेत. त्यामुळे आठ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी पारगड वासीय व शिवप्रेमी यांना ६० किलोमीटर फेरा मारावा लागतो.  मात्र तरीही काम सुरू करण्यासाठी राज्य सरकार वा बांधकाम विभागाकडून काही हालचाल होतांना दिसत नाही. 

गेल्या चार वर्षापासून बंद असलेल्या कामाविषयी पत्रव्यवहार चालू आहेत. न्यूज वारंवार बातम्या चालू आहेत. तरी सुध्दा शासन दुर्लक्ष करत आहे. शिवाय १३ जून २३ ला कोल्हापूर येथे शासन आपल्या दारी ही शासनाची सभा झाली. त्यावेळी रस्त्याचे कागदपत्र पुराव्यासह उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हाती दिले. पण अद्याप काहीही  रस्त्याच्या कामाची हालचाल झालेली नाही. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील अतिदुर्गम भागातील परिस्थिती जैसे थे राहिली आहे. हा रस्ता जर लवकर पुर्ण झाला असता तर दोन्ही तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ५० खेडयांचा विकास झाला असता. कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री  दिपक केसरकर होते आणि त्यांनीच हा रस्ता चालू केला होता. सदर रस्त्यासाठी सन २००५ ते २०१७ दोन्ही तालुक्याच्यां कार्यकर्त्यांनी ३२ आमरण उपोषण केली. हे नामदार दिपकभाई केसरकर आणि भाजपचे माजी आमदार  राजन तेली  यांना पुर्वकल्पना आहे. इतके असूनसुध्दा जाणिवपुर्वक या रस्त्यावर दुर्लक्षितपणा का केला? या रस्त्याच्या त्रुटींसाठी वनखात्याने शासनाकडे १ फेब्रू २३ ला राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी पत्र दिले होते. त्यांच्या त्रुटी पूर्ण का नाही केल्या?  असा सवाल आंदोलकानी उपस्थित केला आहे. 

मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता मार्गी लावण्यासाठी सरकार, लोकप्रतिनिधीना विसर पडला आहे. आणि हे काम सुरू झाले पाहिजे यासाठी चंदगड दोडामार्ग तालुक्यातील पारगड दशक्रोशीतील ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम उपविभाग दोडामार्ग येथे २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला बसणार असा इशारा किल्ले पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार, प्रदीप सिताराम नाईक, प्रकाश गोविंद नाईक, ज्ञानेश्वर चिरमुरे, हरीश चंद्रकांत गवस, समीर रामचंद्र खुठवळकर, विजय पांडुरंग रेडकर व इतरांनी दिला आहे.