
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर गेली कित्येक वर्षे आपण सत्तेत आल्यानंतर सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणून येथील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याच्या फक्त वल्गना केल्या. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील युवांना रोजगाराचा गाजरच दाखवला अशी टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. गोव्या राज्यात नोकरी निमित्त जात असताना अपघात होऊन अनेक तरुण-तरुणींचा मृत्यू झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे राजकर्ते आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, मागील वीस वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवांना गोव्यामध्ये नोकरी निमित्त जात असताना मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणींच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाने २० लाख रुपयांची मदत करावी असं आवाहन यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य शासनाला केले आहे.