सावंतवाडी : दिनांक २४ ऑक्टोबर २०२२ रोजी किल्ले निवतीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाच्या वतीने मराठा आरमार दिन साजरा करण्यात आला. 'भारतीय आरमाराचे जनक' म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. दिनांक २४ ऑक्टोबर १६५७ रोजी ऐन दिवाळीत (धनत्रयोदशी) कल्याण-भिवंडी महाराजांनी काबीज केली व मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत झाली. या वर्षी या घटनेला आता तब्बल ३६५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. म्हणून या ऐतिहासिक दिनाची व आपल्या स्वराज्याच्या दैदीप्यमान, ज्वाज्वल्य किर्तीची आठवण म्हणून सोमवार दि. २४ ऑक्टोबर २०२२ रोजी किल्ले निवतीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे हा दिवस साजरा करीत छत्रपती शिवरायांच्या आरमारी दुर्गास मानवंदना देण्यात आली.
यावेळी किल्ले परिसराची स्वच्छता, सजावट करून महाराजांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन, हार फुले, पणत्या लावून पूजन करण्यात आले. शिवरायांच्या आरमार दलातील मावळ्यांना मानवंदना देण्यात आली. उपस्थित शिवप्रेमींना या दिवसाचे महत्व सांगण्यात आले. या ऐतिहासिक दिनानिमित्त विविध गडसंवर्धन संस्थांना सोबत घेऊन टप्याटप्याने निवती किल्ला संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमाला दुर्ग मावळा कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, सामाजिक उपक्रम विभाग प्रमुख समीर धोंड, कार्याध्यक्ष समिल नाईक, रोहन राऊळ, प्रणय राऊळ, विशाल परब, सुहास सावंत, वेदिका मांडकूलकर, गार्गी नाईक, शैला मांडकूलकर, शिवाजी परब, योगेश येरम, वैभव परब भूषण नेमन इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते. दुर्ग भ्रमंतीनंतर शेवटी फराळाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.