माणूस हीच जात व तोच धर्म : नारायण राणे

सावंतवाडीतील मुस्लिम बांधवांशी साधला संवाद | सर्व जाती-धर्मियांची प्रगती हेच ध्येय : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2024 05:18 AM
views 270  views

सावंतवाडी : निवडणूकीत विरोधक जाती धर्माचे राजकारण करीत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून  राज्यात व देशात काम करीत असताना जात, पात, धर्म मानून कधीही काम केले नाही. माणूस हीच जात व माणूसकी हाच धर्म मानून मी काम करतो. कारण, जात सांगून पोट भरत नाही. प्रत्येक माणसाच्या पोटासाठी अन्न लागतं व ते मिळवून देणं हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार धर्म सांगितले आहेत. महिला, युवा, शेतकरी व गरीब या चारच जाती ते मानतात. या चार जातींच्या उत्कर्षासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली मी गोरगरीबांच्या उत्कर्षासाठी काम करीत आहे. येथील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी नेहमीच माझे प्रयत्न राहिले आहेत. कारण मी साहेब नाही तर देशवासियांचा सेवक आहे. तुम्हीही कधीही हाक मारा कोणतही काम सांगा ते करून देण्याची माझी जबाबदारी आहे अशी ग्वाही लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुस्लीम बांधवांना दिली. सावंतवाडी शहरातील बुराण गल्ली येथील तबरेज बेग यांच्या निवासस्थानी नारायण राणे भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

राणे म्हणाले, राजकारणात काही नेते सोयीचे राजकारण करतात व विविध जाती-धर्माचा आधार घेतात. निवडणुका संपल्यावर विसरून जातात. मात्र, मी नेहमीच राजकारणापलीकडील संबंध जोपासले आहेत. राजकारणाप्रमाणे मी व्यावसायिक देखील आहे. माझे अनेक व्यावसायिक मित्र मुस्लिम आहेत. माझे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच माझ्याकडे काम करीत असलेले माझे सहकारी देखील मुस्लिम आहेत. मी त्यांच्याशी नेहमीच आपुलकीने वागत आलो आहे. कालच राजापूर येथे माजी आमदार हुस्नबानू खलीफे यांची भेट घेतली. या सर्वांशी माझे आपुलकीचे संबंध आहेत. काही लोक गैरसमज करून देतात मात्र जातीपातीचे राजकारण आणि कधीच केले नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला. येथील लोकांनी मला सहा वेळा आमदार म्हणून निवडून दिले. येथील लोकांच्या आशीर्वादामुळेच जीवनात अनेक पदे मिळाली. त्यामुळेच येथील लोकांच्या उत्कर्षासाठी मी नेहमी झटत आलो आहे. येथील लोकांची आर्थिक प्रगती व्हावी त्यांचं राहणीमान सुधाराव येथील मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं, हीच माझी इच्छा असून माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा हेच माझं ध्येय आहे, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.माझ्या आयुष्यात मी जेवढ्या लोकांना नोकऱ्या दिल्या तसेच जेवढे उद्योजक तयार केले तेवढे कोणीच केले नसतील. भविष्यातही या भागात मोठ्या प्रमाणात कारखाने आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. दोडामार्ग आडाळी येथे त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून रिंग रोडचा काम देखील सुरू झाल आहे. देश विदेशातील अनेक कंपन्या या भागात आपले उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

सर्व जाती-धर्मियांची प्रगती हेच ध्येय : दीपक केसरकर

देशातील सर्व जाती धर्मियाची प्रगती झाली पाहीजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारने नेहमीच काम केले. मात्र, आज अनेकजण जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे राजकारण करून  गैरसमज पसरवित आहे. मात्र, या गैरप्रचाराला बळी न पडता आपल्या प्रगतीसाठी प्रत्येकाने मोदींना साथ देतांना आपले उमेदवार नारायण राणे यांना जास्तीत जास्त मतदान करुन लोकसभेवर पाठवा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. 

यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक राजू बेग, मोहिनी मडगांवकर, अल्लाउद्दीन गोकाक, तबरेज बेग, गुलजार खान, मसुद शेख, सज्जाद शेख, नदीम दुर्वेश, ताजुद्दीन दुर्वेश, सर्फराज दुर्वेश, शोएब दुर्वेश, फजल करीम खान, मोहम्मद सलमान फजल खान, फैजान फजल खान यांच्या सह मुल्सिम बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.