
सावंतवाडी : माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथील धालोत्सवाची आज दुपारी सांगता झाली. लोककलांचा वारसा लाभलेल्या माजगाव म्हालटकरवाडा येथील महिलांनी व पुरुषानी आपली संस्कृतीची परंपरा आजही कायम टिकून ठेवली आहे. सात रात्री सुरू असलेल्या धालोत्सवाची शेवटची रात्र वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
महिलांनी समोरासमोर फाटी धरल्यानंतर त्यामधील दोन स्त्रिया पती-पत्नी वेषभूषा करतात वराची वाजत गाजत वरात वाड्यातून देव घराकडे लग्नासाठी येते तुळशीकडे येऊन दानोषाला बसते. त्यावेळी ओव्या म्हटल्या जातात,
रुखवात कर्तलेगे सुंदरी, झेंडे बसले बरोबरी ,असे झेंडे उतावळी, लाडू उचलले वरचेवरी तिथून सर्व मंडळी मांडावर येतात. पती-पत्नी स्त्रियांचे लग्न मांडवार लावले जाते. पती-पत्नी एकत्र येऊन दोन्ही फाटीत त्यांच्या समवेत लोकगीते म्हणतात. यावेळी शिवकळा असलेल्या देवीकडून सर्वांना तीर्थ घातले जाते. रात्री विविध कार्यक्रमानंतर त्यातील पहाटे एक महिला पिंगळी बनून इतर महिला समवेत वड्यातील प्रत्येकांच्या घरी जाऊन पैसे जमा करून ते मांडवर घेऊन येते. सकाळी वाड्यातील पांगलेली सर्वमंडळी एकत्र येऊन कार्यक्रम सुरू करतात. त्यावेळी देवीच्या ओट्या भरणे, नवस बोलणे तसेच ज्या स्त्रीला मूल नाही अशी स्त्री मांडावर शेणाच्या तुळशीत शिवकाळाच्या मदतीने सोबत आणलेले हळद व दुधाचे मिश्रण ओतते त्यावेळी ओव्या गातात. देवी तिला आशीर्वाद देतात बाजूच्या घरी जाऊन पुनश्च साडी बदलून मांडावर आल्यानंतर तिच्या ओटीत नारळ घालतात. त्याचे खोबरे फक्त त्या पती-पत्नीच खायचे अशी अट असते.
सर्व देवी उपस्थितांना आशीर्वाद देतात या सर्व स्त्रियांच्या जागरणाची समाप्ती होऊन कार्यक्रम संपला. धालोत्सवासाठी ग्रामस्थ ,पाहुणेमंडळी ,पंचक्रोशी सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. तुळशीतली पडली देवघरात आणून ठेवली जाते, आता पुढच्या वर्षापर्यंत तिला कोणी हात लावणार नसतो. परत नेहमीसारखा मांड शांत होतो स्त्रियांना हुरूर लावत सात दिवसांच्या गजबजलेल्या रात्रीची सांगता होते.










