
सावंतवाडी : शहरात दिवसातून किमान तीन ते चार वेळा विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. वारा, वादळ, पाऊस नसताना हा प्रकार नेमका का होतोय ? याचीही उत्तरं महावितरण अधिकाऱ्यांकडे नाहीत. कोकणातील पावसापूर्वीची परिस्थिती बघता पावसाळ्यात महावितरणच्या सेवेवर प्रश्न चिन्ह उभ राहील आहे.
राज्याचे उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून व पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यात महावितरण विभागाला लाखोंचा निधी मंजूर झालाय. आमदार निलेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्याकडूनही वीजेची समस्या बघता यासाठी शासनाच सभागृहात लक्ष वेधले, आवश्यक सुविधा आमदार निधीतून दिल्यात. मात्र, महावितरणचा कारभार काही सुधारण्याच नाव घेत नाही. सावंतवाडी शहरातच दिवसातून तीन ते चार वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यात वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. पाऊस, वादळ, वारा नसताना खंडीत होणारा विद्युत पुरवठा नेमका कशासाठी ? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहीला आहे.
दरम्यान, वीजेच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी जिल्ह्यात वीज निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, या कक्षातील फोन संबंधितांकडून उचलला जात नाही आहे. त्यामुळे या विभागाला कोणी वाली आहे की नाही ? हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसापूर्वीची परिस्थिती बघता कोकणातील पावसाळ्यात महावितरणडून कारभार सुधारावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










