विकासकामांच्या मुद्द्यावर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार : उमेश येरम

Edited by: दिपेश परब
Published on: April 02, 2024 11:27 AM
views 141  views

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचा महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी निवडणुकीला फक्त एक महिना राहीला आहे. यामुळे सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी आतापासूनच प्रचाराच्या कामाला लागावे. हा मतदार संघ शिवसेनेचा असून उमेदवार शिवसेनेचाच मिळावा असा सर्वांचाच आग्रह आहे. मात्र महायुतीचे पक्षश्रेष्ठी देतील त्या उमेदवाराचे आपल्याला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम कारायचे आहे. तसेच मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरात झालेल्या कोट्यवधींच्या विकासकामांचा मुद्दा घेऊन महायुतीच्या उमेदवाराची प्रचार यंत्रणा आपल्याला राबवायची असल्याच्या सूचना शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी वेंगुर्ले येथे शिवसेना शहर पदाधिकारी यांच्याशी बोलताना सांगितले. 

   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले शहरातील १७ प्रभागातील सर्व शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, महिला शहर बूथ प्रमुख, महिला संघटिका यांची सप्तसागर अपार्टमेंट मधील शिवसेना कार्यालयात शहरप्रमुख उमेश येरम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शहरातील प्रचार यंत्रणा कशाप्रकारे राबवण्यात यावी, महायुतीच्या माध्यमातून शहरात झालेली विकासकामे मतदारांपर्यंत पोचवणे आदी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तर महायुतीच्या उमेदवाराचे सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला. 

   यानंतर शहर प्रमुख उमेश येरम पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, वेंगुर्ले शहरात अनेक विकासकामे शिवसेना व भाजपच्या माध्यमातून झाली आहेत. यामुळे शिवसेना किंवा भाजप पक्षातील कोणताही उमेदवार असता तरी त्यांना निवडून आणण्यासाठी दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करणार आहोत. वेंगुर्ले शहरात रस्त्यांसाठी मंत्री केसरकर यांनी कोट्यवधींचा निधी दिल्याने शहरातील बहुतांशी रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. सिंधुरत्नच्या माध्यमातून शहरातील बऱ्याच बचत गटांना ताकद देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगार देण्याचे काम झाले आहे. फ्लोरिंग रिसॉर्ट मांडवी खाडी येथे होणार आहे. वेंगुर्ले बंदर सुशोभीकरण अनेक वर्षे रखडले होते यासाठी ४५ कोटी एवढा निधी हा दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. तसेच मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून मिळालेल्या सुमारे १ कोटींच्या निधीतून वेंगुर्ले वासीयांचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली आहे.

     तसेच अनेक वर्षे रखडलेला मांडवी खाडीतील वाळू काढण्याचा प्रश्न मार्गी लागला असून बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे आता मच्छिमारांना होड्या समुद्रात नेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. ही सर्व कामे मंजूर करून आणण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांचा मोठा वाटा आहे. भविष्यात शहरात बरीच विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे नाथ पै कलादालन केंद्र हे काम पूर्ण होऊन उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे.  यामुळे शहरातील नागरिक, मच्छिमार बांधव, शेतकरी हे निश्चितच दीपक केसरकर यांच्या पाठीशी ठाम राहतील व याचा फायदा येत्या लोकसभा निवडणुकीला महायुतीला होईल यात शंका नाही. असे शहरप्रमुख उमेश येरम यांनी सांगितले.

    यावेळी युवासेना शहर प्रमुख संतोष परब, महिला शहर संघटिक श्रद्धा बाविस्कर- परब, अल्पसमख्यांक महिला शहर संघटिका शबाना शेख, जेष्ठ शिवसैनिक आपा मांजरेकर, माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, महिला उपशहर संघटिका मनाली परब यांच्यासाहित शाखाप्रमुख रसिका राऊळ, प्रभाकर पडते, संजय परब, राजू परब, मनोज पांगम, बुथप्रमुख वासुदेव उर्फ बाळा परब, संजना पिंगुळकर, कमलाकर वेळकर, उद्या परब, शिल्पा घोलम, वैशाली रणभिसे, राधा बागवे, गीतांजली गावकर, आपा परब, महेंद्र पालव, विद्या परब आदी उपस्थित होते.